पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर, ते विनाशकारी ठरू शकते, असे वक्तव्य पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अजूनही तणावपूर्ण असताना, पाकिस्तानने हे वक्तव्य केले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरचा मुद्दा देखील अतिशय ज्वलंत प्रश्न ठरत आहे.
डॉन वृत्तपत्राचा हवाला देत पीटीआयने म्हटले की, पाकिस्तानच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी शनिवारी संध्याकाळी सिंगापूरमध्ये आशियचा प्रमुख संरक्षण मंच शांग्री-ला डायलॉगमध्ये हे भाष्य केले. भारताने काश्मीरचा मुद्दा सातत्याने द्वीपक्षीय मुद्दा म्हणून पाहिला आहे. परंतु, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार काश्मीरचा उल्लेख केला, असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रादेशिक संकट-व्यवस्थापन यंत्रणा' या विषयावरील सत्रादरम्यान जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी काश्मीरचा उल्लेख वाद म्हणून केला. या मुद्द्द्यावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी अशा देशांचाही उल्लेख केला, जे मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, चीन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे.
काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक! जनरल साहिर शमशाद मिर्झा म्हणाले की, "संघर्ष नियंत्रणापलीकडे जाऊन संघर्ष निराकरणाकडे जाणे अत्यावश्यक झाले आहे. यामुळे शांतता प्रस्थापित होईल. दक्षिण आशियातील शाश्वत शांततेसाठी, 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि लोकांच्या आकांक्षांनुसार काश्मीर प्रश्न लवकर सोडवणे आवश्यक आहे."
यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नासोबतच पाकिस्तान आणि भारत यांच्यात नुकत्याच झालेल्या लष्करी संघर्षाचाही उल्लेख केला. याविषयी बोलताना ते म्हणाले की, "जेव्हा कोणतेही संकट नसते, तेव्हा काश्मीरवर कधीच चर्चा होत नाही. पण, आम्ही नेहमी हा मुद्दा प्रत्येक स्तरावर मंडला आहे. काश्मीरच्या लोकांच्या आकांक्षा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार काश्मीर वादाचे निराकरण केल्यावरच अनेक प्रश्न सुटतील."