"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:55 IST2026-04-09T10:54:02+5:302026-04-09T10:55:25+5:30
अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी पाकिस्तानला अविश्वसनीय म्हटले आहे.

"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
मध्य पूर्व आशियातील धुमसत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित झाला असला, तरी शांतता प्रक्रियेवरून नवा वाद पेटला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स हे दीर्घकालीन करारासाठी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत. मात्र, या प्रक्रियेत पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका इस्रायलला अजिबात मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. "पाकिस्तान हा विश्वासार्ह देश नाही, अमेरिकेने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला आहे," अशा शब्दांत भारतातील इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानची मध्यस्थी इस्रायलला का खटकतेय?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रूवेन अजार यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, इस्रायल पाकिस्तानला एक जबाबदार किंवा विश्वासार्ह खेळाडू म्हणून पाहत नाही. यापूर्वीही अमेरिकेने कतार आणि तुर्की सारख्या समस्याग्रस्त देशांसोबत काम केले आहे. अमेरिकेच्या स्वतःच्या काही रणनीती असू शकतात, म्हणूनच त्यांनी पाकिस्तानची निवड केली असेल, मात्र इस्रायलसाठी केवळ अमेरिकेसोबतचे ताळमेळ आणि करारातील मुख्य मुद्दे महत्त्वाचे आहेत.
#WATCH | Delhi: On Pakistan's role as a mediator, Israel's Ambassador to India, Reuven Azar, said, "We don't see Pakistan as a credible player. I think that the United States has decided to use the services of the facilitation of Pakistan for their own reasons. We have seen in… pic.twitter.com/UErWPsTzzH
— ANI (@ANI) April 8, 2026
भारताच्या भूमिकेमुळे इस्रायलला मोठे बळ
यावेळी अजार यांनी भारताच्या भूमिकेचे मुक्तकंठाने कौतुक केले. होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक विनाअडथळा सुरू राहिली पाहिजे, ही भारताने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. "इराणच्या बेधुंद मागण्यांसमोर भारत किंवा जगातील कोणताही देश झुकणार नाही, याचा मला विश्वास आहे," असेही ते म्हणाले.
लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे युद्धविराम धोक्यात?
एकीकडे पाकिस्तानमध्ये शांततेची चर्चा होणार आहे, तर दुसरीकडे लेबनॉनवर इस्रायलचे हल्ले अद्याप सुरूच आहेत. इराणने असा आरोप केला आहे की, अमेरिकेने युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन केले असून लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे हा करार मोडू शकतो. मात्र, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, लेबनॉन या युद्धविराम कराराचा भाग नाही.
इस्रायलचा खरा निशाणा इराणवरच!
राजदूत अजार यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत इस्रायल शांत बसणार नाही. इराणमधील राजवट कमकुवत करून तेथील जनतेला स्वातंत्र्य देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.