भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दशकांहून अधिक काळ चाललेल्या तणावाचे मूळ केवळ सीमावाद नसून, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे. पाकिस्तान जोपर्यंत आपल्या भूमीवरून दहशतवादी संघटनांना आश्रय देणे थांबवत नाही, तोपर्यंत संबंध सामान्य होणे शक्य नाहीत, हे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. मे २०२५ मध्ये भारतीय लष्कराने चालवलेले 'ऑपरेशन सिंदूर' याच कठोर धोरणाचे प्रतीक होते, जे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दिलेले सडेतोड उत्तर होते.
भारताची 'झिरो टॉलरन्स' नीति
'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारताने दहशतवादाविरुद्ध आपले 'झिरो टॉलरन्स'चे धोरण अगदी स्पष्टपणे पाकिस्तानला दाखवून दिले. नेहमीप्रमाणे, पाकिस्तानने या कारवाईला राजकीय ठरवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी, त्यांचे नेते दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसले, ज्यामुळे पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा जगासमोर आला.
पाकिस्तानला 'मध्यस्थी'ची गरज का?
अलीकडेच इस्लामाबादमध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पाकिस्तानी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी एक वक्तव्य केले. भारत-पाकिस्तानचे वाद सोडवण्यासाठी तिसरा देश किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मध्यस्थीची गरज आहे, असे ते म्हणाले.
जनरल मिर्झा यांचे हे विधान पाकिस्तानची जुनी मानसिकताच दर्शवते, ज्यात प्रत्येक समस्येवर बाह्य शक्तींकडून मदतीची अपेक्षा असते. भारताने यावर त्वरित प्रतिक्रिया देत, भारत आणि पाकिस्तानचे सर्व मुद्दे द्विपक्षीय आहेत, त्यात तिसऱ्या पक्षाची कोणतीही भूमिका नाही, असे ठामपणे सांगितले. भारताचे हे धोरण १९७२ चा शिमला करार आणि १९९९ च्या लाहोर घोषणेवर आधारित आहे, ज्यात दोन्ही देशांनी परस्पर संवादातून वाद सोडवण्याचे वचन दिले होते.
पाकिस्तानचा कूटनीतिक विरोधाभास
जनरल मिर्झा यांनी आपल्या भाषणात भारताला 'साम्राज्यवादी' आणि 'प्रभुत्ववादी' देश म्हटले. पण त्याचवेळी, त्यांनी भारत ही आज जगातील एक महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती आहे, हे मान्य केले. भारतावर संयुक्त राष्ट्र ठरावांकडे दुर्लक्ष करण्याचा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याचा आरोप त्यांनी केला.
परंतु, हे सर्व आरोप पाकिस्तानची कूटनीतिक निराशा आणि न्यूनगंड दर्शवतात. भारताला 'ट्रोजन हॉर्स' म्हणणारा पाकिस्तान हे विसरतो की, त्याची स्वतःची आंतरराष्ट्रीय ओळख आता एक'दहशतवाद समर्थक देश' म्हणून बनलेली आहे.
लष्कराच्या राजकारणावर टिप्पणी म्हणजे आत्मविरोध
जनरल मिर्झा यांनी भारतीय लष्करावर राजकीय प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. त्यांचा हा आरोप पाकिस्तानमधील वास्तविक परिस्थितीची खिल्ली उडवणारा ठरतो, कारण पाकिस्तान हा तोच देश आहे, जिथे लष्करच राजकारण आणि शासन नियंत्रित करते. तेथे अनेक वेळा लोकशाही सरकारे लष्करी सत्तापालटाद्वारे पाडली गेली आणि इम्रान खान, नवाज शरीफ यांसारख्या नेत्यांना लष्कराच्या विरोधात गेल्यावर तुरूंगात टाकले गेले.
आज भारत केवळ आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्येच नाही, तर जी-२०, ब्रीक्स आणि संयुक्त राष्ट्र सारख्या मंचांवर सक्रिय भूमिका बजावत आहे. जागतिक धोरण-निर्माता म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारत आता केवळ दक्षिण आशियापुरता मर्यादित राहिला नसून, एक असा देश बनला आहे, ज्याचे म्हणणे जग ऐकते. याच कारणामुळे पाकिस्तान वारंवार तिसऱ्या पक्षाचा मुद्दा उपस्थित करून आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
Web Summary : Pakistani General's call for mediation reveals Pakistan's mindset, seeking external help for resolving issues with India. India firmly rejects third-party intervention, emphasizing bilateral talks per existing agreements, highlighting Pakistan's diplomatic contradictions and internal instability.
Web Summary : पाकिस्तानी जनरल की मध्यस्थता की मांग पाकिस्तान की मानसिकता को दर्शाती है, जो भारत के साथ मुद्दों को हल करने के लिए बाहरी मदद की तलाश में है। भारत ने तीसरे पक्ष के हस्तक्षेप को दृढ़ता से खारिज किया, मौजूदा समझौतों के अनुसार द्विपक्षीय वार्ता पर जोर दिया, पाकिस्तान के राजनयिक विरोधाभासों और आंतरिक अस्थिरता को उजागर किया।