पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर भारताच्या या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांवर तुफानी हल्ला करत त्यांचं जबर नुकसान केलं होतं. भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. मात्र ही शस्त्रास्त्रे भारताच्या माऱ्यासमोर फुसकी ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आता चीनच्या संरक्षण प्रवक्त्यांची फे फे उडाल्याचं समोर आलं आहे.
ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनकडून मिळालेल्या काही हत्यारांचा वापर केला होता. त्यातील काही क्षेपणास्त्रं लक्ष्यापर्यंत पोहोचली पण त्यांच्या स्फोट होऊ शकला नाही. चिनी बनावटीचं पीएल-१५ई त्यापैकीच एक क्षेपणास्त्र आहे. पाकिस्ताने भारताच्या दिशेने डागलेलं असंच एक क्षेपणास्त्र आता भारताने ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे चीनची मोठी नाचक्की झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात चिनी शस्त्रास्त्रांना आलेल्या अपयशाबाबत आलेल्या अपयशाबाबत प्रश्न विचारताच चीनच्या संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. तसेच यावर कुठलंही स्पष्ट उत्तर न देता मुत्सद्देगिरीवर भाषण द्यायला सुरू केली.
चीनच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते सीनियर कर्नल झांग जियाओगांग यांना पत्रकारांनी पीएल-१५ई या क्षेपणास्त्राबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले की, तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही ज्या क्षेपणास्त्राचा उल्लेख केला आहे ते क्षेपणास्त्र एक निर्यात केलं जाणारं हत्यार आहे, तसेच अनेकदा देश-विदेशातील प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेलं आहे.
पीएल-१५ई या क्षेपणास्त्राचा उल्लेख चीनकडून सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र म्हणून केला जातो. मात्र जेव्हा पाकिस्तानने त्याचा वापर भारताविरोधात केला, तेव्हा त्याचा स्फोटच झाला नाही. भारताच्या सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी सुस्थितीत असलेलं हे क्षेपणास्त्र ताब्यात घेतलं आहे. हे क्षेपणास्त्र पंजाबमधील होशियारपूर येथे सापडलं होतं.