पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांप्रतीकोलंबियाने शोक व्यक्त केला होता. याला ४८ तास होत नाहीत तोच त्यांनी कोलांटी उडी मारली आहे. हे सर्व दहशतवादीपाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी गेलेल्या शशी थरूर यांच्यामुळे शक्य झाले आहे. थरुर यांनी कोलंबियाच्या सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक घेत त्यांची दहशतवादावरच शाळा घेतली, यामुळे डोळे उघडलेल्या कोलंबियाने मृत दहशतवाद्यांप्रतीची संवेदना अधिकृतरित्या माघारी घेतली आहे.
पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताने खासदारांच्या टीम करून त्या जगभरात पाठविल्या आहेत. जागतिक स्तरावर भारताने एक मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. कोलंबियाला त्यांची भूमिका बदलण्यास भाग पाडण्यात आले आहे. भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेल्या शशी थरूर यांनी आक्षेप घेत कोलंबिया सरकार आणि विरोधकांच्या बैठकीत पाकिस्तानचा चेहरा उघड केला आहे.
आज मिळालेल्या स्पष्टीकरणांच्या आधारे आणि काश्मीरमधील खरी परिस्थिती, संघर्ष आणि घडलेल्या घटनेबद्दल आमच्याकडे आता उपलब्ध झालेली सविस्तर माहिती लक्षात घेता, आम्ही संवाद सुरू ठेवू शकतो, असे कोलंबियाच्या उपपरराष्ट्र मंत्री सुश्री रोसा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांनी म्हटले आहे. यावर आता थरूर यांची प्रतिक्रिया आली आहे.
कोलंबियाने आम्हाला निराश करणारे विधान मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आता भारताचा दृष्टिकोन समजला आहे आणि ते आमच्या बाजूने जोरदार पाठिंबा देऊन एक नवीन विधान जारी करतील, असे थरूर म्हणाले आहेत.
खासदार मिलिंद देवरा यांनी आभार मानले
दरम्यान, शिवसेनेचे खासदार मलिंद देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करुन कोलंबियाचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी कोलंबियाच्या माजी राष्ट्रपती @CesarGaviria_T यांचे आभारी आहे. त्यांनी कोलंबियाच्या विरोधी पक्षाच्या वतीने आणि देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष लिबरल पार्टीच्या वतीने पाकिस्तान आणि राज्य पुरस्कृत दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध करण्याची माझी विनंती विनम्रपणे स्वीकारली.
कोलंबिया का महत्वाचा...
कोलंबिया हा देश फारसा शक्तीशाली नाही. परंतू, लवकरच तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य होणार आहे. यामुळे त्यांचे काश्मीरबाबत विचार बदलणे गरजेचे होते. संयुक्त राष्ट्रांत भारताला अशा देशांची पाकिस्तानविरोधात व्यूहरचना करण्यासाठी गरज आहे. दहशतवादाने घेतलेल्या भारतातील मृतांबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला होता. ज्यावर नऊ खासदारांचे नेतृत्व करणाऱ्या थरुर यांनी आक्षेप घेतला होता.