‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 06:30 IST2025-03-07T06:29:58+5:302025-03-07T06:30:58+5:30
जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे.

‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य
लंडन : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताच्या ताब्यात आल्यानंतर काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटेल, असे उद्गार परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले. ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्र्यांनी लंडन येथील चॅथम हाउसच्या कार्यक्रमात सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या देशाच्या परराष्ट्र धोरणात बदल करत असून, त्यामुळे भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जग एका नवीन व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.
जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे. काश्मीरमधील विकास, तेथील आर्थिक घडी नीट बसविणे हा दुसरा टप्पा व विधानसभा निवडणुका घेणे हा तिसरा टप्पा होता. त्या गोष्टी आता प्रत्यक्षात आल्या आहेत.
पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की, काश्मीरची समस्या संपणार आहे. प्राचीन इतिहास असलेल्या भारत व चीन देशांतील संबंधांत काही चढउतार आले. मात्र आता स्थिती सुरळीत होत आहे. सीमा रक्षणास भारताने प्राधान्य दिले आहे, असेही ते म्हणाले.
खलिस्तानवाद्यांचा घेरावाचा प्रयत्न
जयशंकर यांच्या गाडीला खलिस्तानवाद्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला व भारताविरोधात घोषणा दिल्या. बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. या धक्कादायक घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या घटनेचा ब्रिटननेही निषेध केला. मात्र, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे पोलिसांनी सांगितले.
काश्मीरचा ताबा भारताने सोडावा : पाकिस्तान
पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, भारताने निराधार दावे करू नयेत. त्याऐवजी ७७ वर्षांपासून असलेला जम्मू-काश्मीरचा ताबा भारताने सोडावा.