जकार्ता - मे महिन्याच्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान संघर्षात जर पाकने अणुबॉम्बने हल्ला केला असता तर भारताने काय केले असते? याचा खुलासा इंडोनेशियात भारतीय संरक्षण खात्याने केला आहे. जकार्ता येथे तैनात भारतीय दूतावास कार्यालयातील भारतीय नौदलाचे कॅप्टन शिव कुमार यांनी इंडोनेशियन वायूसेनेसमोर भारताच्या निर्णयाबाबत सांगताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. इंडोनेशिया एअरफोर्स यूनिवर्सिटीत आयोजित २ महत्त्वाचे सेमिनार पार पडले. त्यात भारताने जगाला त्यांचे अणूधोरण स्पष्ट केले. जर पाकिस्तानने अणुबॉम्ब टाकला असता तर भारताने नकाशातून पाकिस्तानला मिटवला असता असा इशाराच नौदल कॅप्टन शिव कुमार यांनी दिला.
ऑपरेशन सिंदूरबाबत शिव कुमार म्हणाले की, जर भारतावर पाकिस्तानने अणुहल्ला केला असता तर हे स्पष्ट होते की, पाकिस्तानचं अस्तित्व नष्ट केले असते हे आमचे धोरण होते असा खुलासा त्यांनी इंडोनेशियात केला. शिव कुमार यांचे हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात जे पाकिस्तानी नेते वारंवार भारताला अणुबॉम्बची धमकी देतात त्यांना हा इशारा दिला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळीही भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात आम्ही कुठल्याही प्रकारचं न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. त्याशिवाय यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधात युद्ध समजले जाईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते.
पाकिस्तानचा मागमूस पुसून टाकला असता...
इंडोनेशियन वायूसेना विद्यापीठाने भारत-पाकिस्तान हवाई युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार आयोजित केला होता. ज्यात आधुनिक मिसाईल, ड्रोन, एअर डिफेन्स याच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. भारतीय हवाई दलाने ज्या अचूकपणे पाकिस्तानात हल्ले केले. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानच्या ११ एअरबेसवर हल्ले केले या ऑपरेशनची माहिती इंडोनेशिया हवाई दलाला हवी होती. चर्चासत्रादरम्यान, भारताने 'अण्वस्त्र मर्यादे'च्या खाली राहून संतुलित परंतु प्रभावी लष्करी कारवाई केली आणि भारताने युद्ध पूर्णपणे नियंत्रणात ठेवले असं इंडोनेशियन संरक्षण तज्ञांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानविरोधात अत्याधुनिक प्रिसिजन गाइडेड मिसाइल, स्टील्थ ड्रोन आणि एंटी रेडिएशन शस्त्रांचा वापर केला. भारताचे हल्ले अचूक आणि गतीशील होते ज्यामुळे पाकिस्तानी एअरबेसवरून त्यांची लढाऊ विमाने उड्डाणच घेऊ शकली नाहीत. भारत या युद्धात अशा स्थितीत होता जिथे पाकिस्तानातील हवाई सैन्याला काहीच करता आले नसते. भारताने पाकच्या एअरबेसवर हल्ले करून यापुढच्या काळात पाकिस्तानने युद्धासाठी उकसवलं तर भारत काय करू शकतो हे दाखवून दिल्याचेही तज्ज्ञांनी म्हटलं.