गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे मुस्लिम देशांची संबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. एकीकडे भारताचे पाकिस्तनसोबतचे संबंध दिवसेंदिवस बिघडत आहेत, तर दुसरीकडे सौदी, इराण, यूएईसारख्या देशांसोबतचे व्यावारीक संबंध मजबूत होत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर तर अनेक देशांनी घटनेचे खंडन करताना, पाकिस्तानलाही सुनावले. दरम्यान, आता पाकिस्तानचा मित्रराष्ट्र असलेल्या यूएईने भारताचे कौतुक केल्यामुळे पाकिस्तानला आणखी मिरची लागली आहे.
यूएईचे राजदूत अब्दुलनासेर अलशाली म्हणाले की, भारतीय नागरिकांसाठी यूएईच्या व्हिसा ऑन अरायव्हल कार्यक्रमाचा विस्तार हा भारतासोबतच्या त्यांच्या कायमस्वरुपी भागीदारीचे प्रतिबिंब आहे. हे एक व्यावहारिक पाऊल आहे, जे कुटुंबांना पुन्हा एकत्र येणे, व्यावसायिकांना सहकार्य करणे आणि सीमा ओलांडून व्यवसाय वाढवणे सोपे करेल. दोन गतिमान आणि दूरदर्शी राष्ट्र म्हणून, आम्ही आमच्या लोकांमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणखी मजबूत पूल बांधण्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील यूएई मिशनने भारतीय नागरिकांसाठी वाढीव व्हिसा ऑन अरायव्हल धोरणाचे महत्त्व अधोरेखित कराना, द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, भारत यूएईच्या पर्यटन यशाचा आधारस्तंभ बनला आहे. एका अंदाजानुसार २०२३ मध्ये सुमारे ४.५ मिलियन भारतीयांनी यूएईला भेट दिली. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक आणि सिंगापूर येथून वैध निवास परवाने असलेले भारतीय पासपोर्ट धारक यूएईच्या सर्व प्रवेश बिंदूंवर व्हिसा ऑन अरायव्हल मिळविण्यास पात्र असतील.
गेल्या काही वर्षांपासून भारत-यूएई द्विपक्षीय संबंध वाढत आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक यूएई भेटीनंतर, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचले. २०२२ मध्ये दोन्ही बाजूंनी व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध लक्षणीयरीत्या विस्तारले. यूएई दूतावासाने एका निवेदनात म्हटले की, यूएई आणि भारतासारख्या खोल आर्थिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध असलेल्या देशांसाठी, गतिशीलता केवळ आवश्यक नाही तर परस्पर विश्वासाचे प्रतीक देखील आहे.