India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे नष्ट केले. या कारवाईदरम्यान, भारतीय सैन्याने असीम मुनीरच्या पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करुन सोडले. आपला पराभव दिसत असल्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर युद्धविरामासाठी हात पसरले. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आता भारतीय शिष्टमंडळाने युद्धविरामाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
मलेशियातील क्वालालंपूर येथे पोहोचलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संजय झा करत आहेत. केंद्र सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना संजय झा म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम पूर्णपणे द्विपक्षीय होता, त्यात तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. पाकिस्तानने भारताकडे विनवण्या केल्यामुळे युद्धविराम झाला. पाकिस्तानी डीजीएमओने यासाठी भारतीय डीजीएमओशी चर्चा केली होती.
पाकिस्तानने घाबरुन फोन केला...ते पुढे म्हणाले, काही लोक विचारतात की, हा युद्धविराम कसा झाला? तर यासाठी 10 मे रोजी पाकिस्तान सकाळपासूनच भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी भारतातील पाकिस्तानी दूतावासातील लोकांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी हॉटलाईनवर चर्चा करुन युद्धविरामाची विनंती केली. यानंतर भारत युद्धविरामासाठी सहमत झाला. आम्हाला हा संदेश द्यायचा होता की, आम्हाला फक्त त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट करायचे होते आणि आम्ही ते केले, अशी माहिती संजय झा यांनी दिली.