बीजिंग: पूर्व लडाखमधील सीमा तंट्यामुळे गेल्या चार वर्षांपासून विकोपाला गेलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी बुधवारी चर्चा केली.
भारत व चीनमध्ये असलेल्या मतभेदांच्या मुद्द्यांवर २३वी विशेष प्रतिनिधी बैठक सुमारे पाच वर्षांनंतर होत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबद्दल डोवाल व यांग ली यांनी चर्चा केली.
पूर्व लडाखमध्ये सीमेवरून सैन्य मागे नेण्याच्या तसेच गस्त घालण्यासंदर्भात भारत व चीनमध्ये २१ ऑक्टोबर रोजी करार झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात जी बोलणी झाली त्यानुसार चीनने भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती. (वृत्तसंस्था)
चीन म्हणतो, मतभेदांवर तोडगा काढायची इच्छा
भारतासोबत असलेल्या मतभेदांवर तोडगा काढण्याची चीनची प्रामाणिक इच्छा आहे, असे त्या देशाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिन जिआन यांनी सांगितले. दोन्ही देशांचे संबंध पूर्वीप्रमाणे सुरळीत व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.