भारत खरोखरच भाग्यवान देश; त्यांच्याकडे Serum Institute सारखी संस्था आहे; World Bank अध्यक्षांकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 11:44 AM2021-04-06T11:44:23+5:302021-04-06T11:46:57+5:30
Corona Vaccine : सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं कोरोना काळात अनेक देशांना लसींचा पुरवठा करून केली होती मोठी मदत
कोरोनाच्या महासाथीदरम्यान अनेक देश कोरोना प्रतिबंधात्मक लसी विकसित करण्याचे प्रयत्न करत होते. भारतही यात अग्रस्थानी होता. दरम्यान, भारतात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरणालाही सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसींचा समावेश आहे. दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं कोरोनाच्या कालावधीत अनेक देशांना लसींचा पुरवठा केला. तसंच या कालावधीत भारतातही लसींचा पुरवठा सुरू होता. दरम्यान, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी सीरम इन्स्टीट्यूटसारखी जागतिक लस उत्पादन करणारी संस्था भारताकडे असल्याचं सांगत यासाठी भारत खरंच भाग्यवान आहे असं म्हणत गौरव केला. तसंच देशांतर्गत लसीकरणाचा वेगही वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आपण प्रोत्साहित होत असल्याचं ते म्हणाले. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या आगामी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
"माझा सीरम इंन्स्टीट्यूट ऑफ इंडियासोबत अनेकदा संपर्क राहिला आहे. देशात जागतिक लस उत्पादन करणारी संस्था आहे हे भारताचं भाग्य आहे," असं डेव्हिड मालपास म्हणाले. "त्यांनी स्थानिक गरज पूर्ण करण्यासाठी देशात आणि जगातील इतर देशांना मदत करण्याच्या उद्देशानं अधिक पारदर्शकता आणली आहे. अमेरिका किंवा युरोपमध्ये, तसंच दक्षिण आफ्रिकेत किंवा भारतात तेथील मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक उत्पादनाच्या काय गरजा आहेत हे स्पष्ट झालं नाही," असं ते एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. भारतानं देशांतर्गत लसीकरण कार्यक्रमाचाही वेग वाढवला असल्यानं मी आनंदीत आहे आणि आम्ही यावर त्यांच्यासोबत काम करत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं.
लसीकरण मोहिमेसाठी अनेक लोकांची गरज
"आपल्याला क्षमतेची मर्यादा खूप जास्त आहे. यासाठी लसीकरण मोहीम जे चालवत आहेत त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी अनेक लोकांची गरज भासते," असंही मालपास म्हणाले. देशात शुक्रवारपर्यंत एकूण ७,०६,१८,०२६ लोकांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली होती. लसीकरणाच्या प्रक्रियेला मोठा कालावधी लागतो. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये लवकरात लवकर लसींचा पुरवठा झाला पाहिजे ही महत्त्वाची बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं.