PM Modi at G7 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत. कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांसह दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नेत्यांची भेट घेतली. जी-७ आउटरीच सत्राला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला. तसेच या जागतिक धोक्याविरुद्ध एकत्रित आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केले. कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.
कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांचे शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी कार्नी यांनी आपण ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा संक्रमण, एआयचे भविष्य, दहशतवादाविरुद्धच्या लढाईवर एकत्र काम करू शकतो. तुम्ही येथे असणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे, असं म्हटलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना चांगलेच फटकारले.
"जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी, आपले विचार आणि धोरण स्पष्ट असले पाहिजेत. जर एखादा देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. एकीकडे, आपण आपल्या मर्जीनुसार विविध निर्बंध लादतो, तर दुसरीकडे, जे देश उघडपणे दहशतवादाला पाठिंबा देतात त्यांना बक्षीस दिले जाते. हे दुहेरी निकष थांबले पाहिजेत. २२ एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ पहलगामवर हल्ला नव्हता तर प्रत्येक भारतीयाच्या ओळखीवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला होता. तो संपूर्ण मानवतेवर हल्ला होता.," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, "पंतप्रधानांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेत्यांचे आभार मानले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध जागतिक स्तरावर कडक कारवाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे."