बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस, सध्या भारतासोबत निर्माण झालेले वाईट संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान युनूस सरकारने पाकिस्तान आणि चीनला मोठा धक्का दिला आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी गुरुवारी (२६ जून २०२५) बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान आघाडीची शक्यता फेटाळून लावली.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, नुकतीच झालेली तिन्ही देशांतील बैठक राजकीय नव्हती. या बैठकीचा हेतू, भारताला बाजूला सारणे असा होता का? असे विचारले असता, तौहीद हुसेन म्हणाले, मी खात्री देतो की, भारताला लक्ष्य म्हणून, असे काही केलेले नाही.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी एका निवेदनात म्हटले होते की, बांगलादेश, चीन आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी कुनमिंग येथे चीन-दक्षिण आशिया प्रदर्शन आणि चीन-दक्षिण आशिया सहकार्य मंच संदर्भात बैठक केली होती. चीन आणि पाकिस्तानने या बैठकीसंदर्भात स्वतंत्र निवेदनही जारी केले होते. "या बैठकीत तिन्ही पक्षांमधील सहकार्यावर विस्तृत चर्चा झाली आणि चांगले शेजारी म्हणून पुढे जाण्याचे ठरले, असे चीनने म्हटले होते. तर पाकिस्तानने, बांग्लादेश-चीन-पाकिस्तान यांच्यात तयार झालेला एक गट, असे म्हटले होते. याशिवाय, बांगलादेशचे तौहीद हुसैन म्हणाले होते की, बैठकीत प्रामुख्याने कनेक्टिव्हिटी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली.
भारतासोबतचे संबंध चांगले करण्याची बांगलादेशची इच्छा -यावेळी तौहीद हुसैन म्हणाले, आपण सत्य स्वीकारायला हवे. भारत आणि मागील सरकार (पदच्चूत पंतप्रधान शेख हसीना) यांचे ज्या प्रकारचे संबंध होते आणि ज्या प्रकारचे संबंध भारताने प्रस्थापित केले होते, त्या प्रकारचे संबंध आता नाहीत. एका प्रश्नाच्या उत्तर देत ते म्हणाले, जर भारताने बांगलादेश आणि नेपाळसोबत, अशी बैठक केली, तर ढाकाही यासाठी तयार आहे.