वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:24+5:302021-02-05T07:54:24+5:30
पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे. ...

वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला
पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे. मागील वर्षभरापासून हे काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच शेतीपयोगी साहित्य शेतात नेण्यासाठी या पुलाच्या अपूर्ण कामामुळे मोठा त्रास होत आहे.
रस्त्यावर खड्डेच खड्डे
हिंगोली : आदर्श कॉलेजजवळील पाण्याच्या टाकीपासून शाहुनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता उताराचा असून, अनेक वाहने याठिकाणाहून वेगाने धावत असतात. पण, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना चुकविताना अनेक वाहनधारक पडत असल्याचे प्रकार घडले आहेत. यासाठी हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरवासियांसह वाहनधारकांतून होत आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित
औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. गावाचा वीजपुरवठा दोन महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. गावातील वीज खंडित राहात असल्याने गावकऱ्यांत महावितरणच्या कारभाराविषयी रोष निर्माण होत आहे. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेकांची वीज उपकरणेही जळाली आहेत. यामुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी
आंबाचोंडी : कोरोना या महामारीमुळे हिंगोली रेल्वे स्थानकातील पॅसेंजर रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. आता भारतातील सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी कोरोनामुळे बंद करण्यात आलेली ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. पॅसेंजर रेल्वेच्या तिकिटाच्या तुलनेत बस व इतर वाहनांचा खर्च जास्त असून, हा सामान्य नागरिकांना परवडत नाही. यासाठी ही सेवा जलदगतीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
रस्ता दुरूस्तीची मागणी
पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील चार महिन्यांपासून हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. यासाठी हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
वातावरण बदलामुळे रुग्ण संख्या वाढली
वसमत : मागील दोन दिवसांपासून अचानक ढगाळ वातावरण झाले आहे. या वातावरण बदलामुळे बालक आणि वयाेवृद्ध ग्रासले गेले आहेत. बालकांना ताप, हिवताप, खोकला, सर्दी तर वयोवृद्धांना दमा, अंगदुखी, डोकेदुखी असे रोग होत आहेत. वातावरण बदलामुळे तालुक्यातील अनेक रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत.
मजुरांचे स्थलांतर वाढले
औंढा नागनाथ : सध्या तालुक्यातील रोहयोचे काम सुरू नसल्यामुळे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह कामाच्या शोधात परगावी जात आहेत. तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मजूर वर्गाचा ताफा परगावी जात असल्याचे दिसत आहे.