ओला चारा आणला, तसाच घरी न्यावा लागतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:36+5:302021-03-06T04:28:36+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने मागील चार दिवसांपासून टाळेबंदी लागू केली आहे. पशुपालक ओला ...

ओला चारा आणला, तसाच घरी न्यावा लागतोय
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने मागील चार दिवसांपासून टाळेबंदी लागू केली आहे. पशुपालक ओला चारा खरेदीसाठी येत नसल्यामुळे रानावनातून गोळा करून आणलेला ओला चारा सायंकाळ झाली की परत नेण्याची वेळ छोट्या विक्रेत्यांवर आली असून, लेकराबाळांना उपाशीपोटीच रहावे लागत आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने आजमितीस मार्च महिना सुरू झाला असला, तरी ओला चारा मिळू लागला आहे. सकाळ झाली की, रानावनातून ओला चारा गोळा करून शहराच्या ठिकाणी विक्रीला आणला जातो. ओला चारा विक्रीतून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवत कुटुंबाचा गाडा हाकला जातो. परंतु, मागील चार दिवसांपासून मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, गोळा करून आणलेला चारा पशुपालक खरेदीसाठी येत नसल्यामुळे
परत न्यावा लागत आहे. जिल्ह्यातील आजूबाजूच्या दहा ते पंधरा खेड्यांतील छोटे विक्रेते रानावनातून ओला चारा गोळा करून शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. शहरातील इंदिरा चौक, गांधी चौक, रिसाला बाजार, खटकाळी बायपास, औंढारोड आदी मोक्याच्या ठिकाणी हे विक्रेते ओला चारा घेऊन बसतात. परंतु, कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. कोरोना आजार वाढू नये म्हणून प्रशासनाने घेतलेला निर्णय चांगला असला, तरी छोट्या विक्रेत्यांची मात्र उपासमार होताना दिसून येत आहे. शेळी, गाय, बैल, म्हैस, घोडे, मेंढी आदी पशुपालक रोज चारा छोट्या विकेत्यांकडून घेऊन जातात. कडब्याचे भाव २ हजार ते २ हजार २०० असे असल्यामुळे पशुपालकांना कडबा घेणे परवडत नाही. त्यामुळे ते सकाळच्यावेळेला छोट्या विक्रेत्यांकडून ओला चारा विकत नेतात. ओला चाऱ्याची किंमत १५ रुपये पेंडी असली, तरी पशुपालकांनी जास्त प्रमाणात पेंडी घेतल्यास त्याचा भावही कमी केला जातो, असे विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोनामुळे होताहेत गरिबांचे हाल
दहा-बारा वर्षांपासून ओला चारा शहराच्या ठिकाणी आणून त्यातून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा गाडा हाकतो आहे. मागच्यावर्षी पाच महिने उपाशीपोटी राहण्यातच गेले. घरात लहान-मोठे सहा सदस्य आहेत. चार दिवसांपासून अर्धपोटीच राहण्याची वेळ आली आहे. दिवसाकाठी चारशे रुपये मिळायचे. परंतु, सध्या शंभर रुपयेच पदरात पडत आहेत. भाजीपाला, किराणा दुकान उघडे नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हा गरिबांना आर्थिक मदत करावी.
- सदानंद यादव, ओला चारा विक्रेता, राहोली
फोटो