हिंगोली: अभ्यासाला बसतोय, परंतु अभ्यासात मनच लागत नाही, अशा तक्रारी किशोरवयीन मुलांच्या असून, २०१९-२० या वर्षात हा आरोग्यविषयक तक्रारींचा (समस्या) आकडा ९ हजार ६०० वर पोहोचलेला पहायला मिळत आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात २०१४ या वर्षापासून काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो असून त्यात हिंगोली जिल्ह्यााचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी ९ हजार ६०० तक्रारी या आरोग्यविषयक होत्या. यामध्ये १० ते १९ वयोगटातील मुला-मुलींचा समावेश होता. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत ३ हजार ८४० मुलांच्या तर ५ हजार ७६० या मुलींच्या तक्रारी आल्या होत्या. आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी १६ समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींनी तक्रारी केल्या आहेत त्यांच्या तक्रारी जाणून त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन करत त्यावर मार्ग काढून दिला जातो. लॉकडाऊन काळात या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मार्च २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. एप्रिल ते जुलै दरम्यान हा कार्यक्रम बंद होता. शाळा-महाविद्यालयांनाही सुटी होती. त्यानंतर शहरातील नागरी आरोग्य केंद्रात तसेच अंगणवाडी अंतर्गत आलेल्या तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लॉकडाऊन काळात जवळपास २५ ते ३० कार्यक्रम या कार्यक्रमातंर्गत घेण्यात आले.
२०२० मध्ये आलेल्या तक्रारींची संख्या-९६००
३८४० मुुलांच्या तक्रारी
५७६० मुलींच्या तक्रारी
मोबाईलशिवाय करमत नाही...
मोबाईलशिवाय करमत नाही, काय करू अभ्यासात मन लागत नाही, डोके दुखते, पोट दुखते अशा एक ना अनेक समस्या मुला-मुलींच्या असतात. बहुतांश वेळा मुले-मुली दिवस-दिवस मोबाईलवर असतात. यामुळे मोबाईलचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. कधी-कधी डोकेही जड पडते. काही सुचत नाही. तेव्हा पालकांनी मुला-मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बॉक्स
आरोग्य विषयक असतात तक्रारी
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यकमात जास्त करुन आरोग्य विषयकच तक्रारी जास्त आलेल्या होत्या. अशावेळी मुले-मुलींची तक्रार जाणून घेऊन त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन केले आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींना समुपदेशन केले आहे. किशोरवयीन मुला-मुलींसमवेत पालकांनाही समुपदेशन करण्यात आलेले आहे.
बॉक्स
लाॅकडाऊन नंतर...
मार्च महिन्यात कोरोना आजाराने डोके वर काढले होते. त्यानंतर एप्रिल ते जुलै या दरम्यान सर्वत्र व्यवहार बंद होते. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले होते. यानंतर अनेक मुले-मुलींच्या तक्रारी आल्या. प्रत्येकाच्या घरी जाणे तर शक्य नसते. म्हणून आम्ही शहरातील नागरी आरोग्य केंद्रात या सर्वांच्या तक्रारींचे निरसन करुन योग्य प्रकारे समुपदेशन केले, अशी माहिती जिल्हा समन्वयक अनुराधा पतरोड यांनी दिली.