आजपासून दुकाने उघडणार; कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST2021-04-05T04:26:40+5:302021-04-05T04:26:40+5:30
हिंगोली : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता दिली असून, नियम व अटी पाळून दुकाने, आस्थापना उघडण्यास परवानगी ...

आजपासून दुकाने उघडणार; कोरोना चाचणी बंधनकारक
हिंगोली : जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता दिली असून, नियम व अटी पाळून दुकाने, आस्थापना उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तर प्रत्येक आठवड्यात शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ४ एप्रिल रोजी काढले आहेत.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत संचारबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. संचारबंदीची मुदत संपली असून, ५ एप्रिलपासून संचारबंदीमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, यासाठी आस्थापना चालक, दुकानदार, व्यापारी, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तसेच दर १५ दिवसाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. या कालावधीत रात्रीची संचारबंदी मात्र कायम राहणार असून, शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवारी सकाळी ७ या कालावधीत कडक संचारबंदी असणार आहे.
संचारबंदी काळात केवळ औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवा, तसेच परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजार, गावामध्ये, तसेच घराबाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
आजपासून सुरू राहणार
- कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी सेवा दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळात सुरू राहतील.
- भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकाने, मांस, मच्छी, मटन विक्री दुकाने, दारू व बीअर विक्री दुकाने सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडण्यास परवानगी. यात नगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच भाजीपाला दुकाने लावावी लागणार आहेत.
- मेडिकल दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ तर इतर दुकाने १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडता येणार.
- बँका नागरिकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहतील.
- एसटी बसला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे. मात्र, शासकीय बसस्थानकाव्यतिरिक्त इतर कोठेही बस थांबविता येणार नाही.
-ऑटोरिक्षात चालकासह तिघे, जीप व त्या प्रकारातील वाहतुकीस चालकासह सहा जण, खाजगी कार वाहनात केवळ चालकासह चौघा प्रवाशांनाच वाहतूक करण्यास परवानगी असणार आहे.
- दोनचाकी वाहनावर केवळ एका व्यक्तीस परवानगी असणार आहे.
- शासकीय कार्यालये पूर्णवेळ तर खाजगी कार्यालये सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल.
-लग्न व लग्नासंबंधित कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. मात्र, यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
- अंत्ययात्रेस केवळ २० व्यक्तींना परवानगी असेल. यासाठी कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही.
-रेस्टॉरंट, हॉटेल्स, बीअर, वाइन बार इत्यादींना केवळ ग्राहकांना पार्सल सुविधा देण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत उघडण्यास परवानगी असणार आहे.
यांना असणार प्रतिबंध
-शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, लॉन्स, मंगल कार्यालये, जलतरण तलाव
-धार्मिक, प्रार्थनास्थळे बंद राहणार
-धरणे, आंदोलने, प्रदर्शने आदींना बंदी