वीज पुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:15+5:302021-03-18T04:29:15+5:30
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हिंगोली: जिल्ह्यात १९ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळ, वारा, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची ...

वीज पुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हिंगोली: जिल्ह्यात १९ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळ, वारा, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी जनावरे व जनावरांच्या चाऱ्याची साठवणूक योग्य ठिकाणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.
हळद काढणीला सुरुवात
हिंगोली: तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे व परिसरात गत दोन दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्याने शेतकरी उन्हाच्या आधी हळद कशी काढता येईल, याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे हळदीचे उत्पन्न गतवर्षीपेक्षा कमी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे पहायला मिळत आहेत.
मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त
कळमनुरी: शहरातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वेळोवेळी शहर वाहतूक शाखेला कळविण्यात आले; परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
‘स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज’
कळमनुरी: येथील बसस्थानकात पाणी पाऊच, पाण्याची बॉटल, गुटख्याच्या पुड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकातील प्रवाशांना कचऱ्याचा त्रास होत आहे. मध्यंतरी काही प्रवाशांनी आगार प्रमुखांना बसस्थानकातील कचऱ्याबाबत सांगितले; परंतु अद्याप तरी दखल घेतली गेली नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.
वाडी- तांड्यांवर पाणीटंचाई
करंजी: वसमत तालुक्यातील करंजी परिसरातील वाडी-तांड्यावर तसेच छोट्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे हातपंपही बंद पडलेले आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता तालुका प्रशासनाने गावोगावी पाण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच
हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बस स्थानक परिसर आदी भागात मागील काही दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘जड वाहने बाजारपेठेत दाखल’
हिंगोली: जड वाहनांना शहरात परवानगी नसतानाही दोन-चार दिवसांपासून जड वाहने शहरात दाखल होत आहेत. जड वाहनांसाठी खटकाळी बायपास करून दिलेला असताना काही जड वाहने हे शहराच्या मध्यवस्थीतून बिनधास्त जात आहेत. जड वाहनामुळे बुधवारी दुपारच्या वेळेला काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरातून प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.