रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:23+5:302021-03-08T04:28:23+5:30
हरभरा काढणीला सुरुवात डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील लोहगाव, डिग्रस, दाटेगाव, बोरजा आदी गावांत मागील काही दिवसांपासून हरभरा, ...

रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
हरभरा काढणीला सुरुवात
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील लोहगाव, डिग्रस, दाटेगाव, बोरजा आदी गावांत मागील काही दिवसांपासून हरभरा, गहू काढणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. अजून काही शेतकऱ्यांचे गहू व हरभरा काढणी बाकी आहे. वाढत्या उन्हामुळे पिकांच्या काढणीला व्यत्यय येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
गतिरोधक बसविण्याची मागणी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस-कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गतिरोधक बसविण्याबाबत अनेकवेळा संबंधितांना सांगण्यात आले, परंतु, अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. हा राज्य रस्ता असल्याने वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात आहे. काही वाहनधारक वेगाने वाहने चालवित असल्यामुळे अपघात घडून येत आहेत. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक टाकावे, अशी मागणी होत आहे.
बसस्थानकात पिण्याचे पाणी मिळेना
हिंगोली : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळेना झाले आहे. प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, याबाबत महामंडळाच्या वरिष्ठांना सांगण्यात आले. परंतु, अद्याप तरी कोणीही लक्ष दिले नाही. उन्हाची तीव्रता लक्षात घेता महामंडळाने प्रवाशांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
बसस्थानकात कचऱ्याचे ढीग
कळमनुरी : येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वाऱ्यामुळे गोळा करून ठेवलेला कचरा विखुरला जात आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.