दिल्लीत बेपत्ता झालेल्या तरूणाचा शोध लावण्यात पोलिस पथकास यश
By Admin | Updated: July 9, 2014 00:07 IST2014-07-08T23:47:49+5:302014-07-09T00:07:57+5:30
हिंगोली : खासगी कंपनीच्या आॅनलाईन योजनेमध्ये १५ ते २० लाखाची गुंतवणूक केल्यानंतर संबंधितांकडून पैसे परत आणण्यासाठी दिल्ली येथे गेलेला कैलास यतीराजम नल्लेवार हा तरूण १५ दिवसांपासून बेपत्ता होता.

दिल्लीत बेपत्ता झालेल्या तरूणाचा शोध लावण्यात पोलिस पथकास यश
हिंगोली : खासगी कंपनीच्या आॅनलाईन योजनेमध्ये १५ ते २० लाखाची गुंतवणूक केल्यानंतर संबंधितांकडून पैसे परत आणण्यासाठी दिल्ली येथे गेलेला कैलास यतीराजम नल्लेवार (वय ३३) हा तरूण १५ दिवसांपासून बेपत्ता होता. हिंगोलीच्या विशेष पथकाने सायबर सेलच्या मदतीने त्याचा शोध घेतला असून या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी पथकास १० हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.
वसमत येथे औषधी विक्रीचा व्यवसाय करणारा कैलास यतीराजम नल्लेवार याने एका खासगी कंपनीच्या आॅनलाईन योजनेत पैसे गुंतवले होते. गुंतवलेले पैसे मुदतीत परत न आल्याने रक्कम वसूल करण्यासाठी सदर तरुणाने दिल्ली गाठली. २३ जून रोजी दिल्लीला पोहोचल्यापासून सदर तरुणाचा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. हा तरुण बेपत्ता झाल्याने कुटूंबियांची शंका बळावली.
या प्रकरणी तरुणाचा भाऊ कालिदास नल्लेवार याने वसमत पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून आरोपी मनिष शर्मा व गौतम (दोघे रा. दिल्ली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास नल्लेवार याने त्यांच्याकडे पैसे गुंतवले होते. पैसे परत आणण्यासाठी कैलास गेला असता त्या दोघांनी त्याचा खून करण्याच्या इराद्याने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, फौजदार रामेश्वर कायंदे, राठोड व अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेले विशेष पथक ६ जुलै रोजी दुपारी दिल्लीतील पहाडगंज भागात पोहोचले. कैलास नल्लेवार याचे लोकेशन त्याच भागात असल्याचे सायबर सेलच्या माहितीवरून समजले. दरम्यान, त्याने आपले दोन्ही मोबाईल बंद करून नवीन सीमकार्डवरून नांदेड व औरंगाबादच्या मित्रांना कॉल केले. स्वत:जवळील पैसे संपल्याने त्याने दोनवेळा मित्रांना आपल्या बँक खात्यावर रक्कम टाकण्यास सांगितले होते.
दरम्यान, दिल्लीत पोहोचलेले डीवायएसपी पियुष जगताप, हिंगोलीत पोलिस अधीक्षक दाभाडे व सायबर सेल, वसमतमध्ये पोनि रवींंद्र गायकवाड आणि कैलास नल्लेवार याच्या दोन्ही मित्रांशी पोलिस यंत्रणेने सातत्याने संपर्क ठेवला होता. दिल्ली पोलिसांच्या मदतीशिवाय हा तपास पूर्ण करण्यात आला. कैलासने ज्या एटीएम सेंटरमधून पैसे काढले होते, त्याच ठिकाणी ७ जुलै रोजी रात्री ८ वाजता त्याला विशेष पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला घेऊन डीवायएसपी जगताप यांचे पथक दिल्लीहून मंगळवारी वसमतकडे निघाले असून बुधवारी दुपारपर्यंत ते पोहोचणार आहे.
कैलास नल्लेवार याने कुटुंबियांशी संपर्क का तोडला? त्याचे खरोखरच अपहरण झाले होते का? त्याने गुंतवलेल्या पैशांचे काय झाले? आदी प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासात मिळणार आहेत. (प्रतिनिधी)
पथकास मिळणार रिवार्ड
२३ जूनपासून बेपत्ता झालेला कैलास नल्लेवार याच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून तरूणाचे वडील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसोबत दिल्लील जाऊन आले होते; परंतु काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, नल्लेवार कुटुंबियांनी उच्च न्यायालयात ‘हेबिअस कॉर्पस’ दाखल केले. हायकोर्टाने ४ जुलै रोजी पोलिस अधीक्षक व उपअधीक्षकांना निर्देश देत, बेपत्ता तरूणाच्या शोधासाठी विशेष पथक पाठवून तपास करा आणि ९ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही शोधमोहीम घेण्यात आली. सायबर सेलच्या मदतीने विशेष पथकाने दिल्लीत पोहोचल्यानंतर अवघ्या २४ तासात बेपत्ता तरूणाचा शोध लावून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी १० हजाराचे रिवार्ड घोषित केले आहे.