महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:46+5:302021-01-24T04:13:46+5:30
कळमनुरी : हिंगोली-नांदेड मार्गावरील हिंगोली ते आराटीपर्यंतच्या महामार्गाची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविल्यानंतरही ...

महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण
कळमनुरी : हिंगोली-नांदेड मार्गावरील हिंगोली ते आराटीपर्यंतच्या महामार्गाची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविल्यानंतरही पुन्हा ‘जैसे थै’ स्थिती झाली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना वाढत असून, जायबंदी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
हिंगोली-नांदेडला जोडणाऱ्या अकोला-वारंगा फाटा या राज्य रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ मध्ये रूपांतर झाले आहे. त्याअनुषंगाने हिंगोलीजवळील सावरगाव ते माळधामणी फाटापर्यंत कामही काही प्रमाणात झाले आहे. मात्र पूर्वीचा राज्य शासनाच्या ताब्यात असतानाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महामार्ग होत असला, तरी अजूनही जुन्याच डांबरी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. पुढे उमरा, मसोड फाटा, कळमनुरी, मोरवाडी, माळेगाव, पार्डीमोड, आराटी ते पुढे आखाडा बाळापूरपर्यंतच्या रस्त्यावर अनेकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. उमराजवळही ऐन वळणावर खड्डे असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच कळमनुरी शहरातील जुना बसथांबा, आदिवासी प्रकल्प कार्यालय परिसरातील खड्डे चुकविताना वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. मोरवाडीजवळील खड्डे चुकविताना तर चालक कितीही निष्णात असला तरी, वाहन खड्ड्यातून न्यावेच लागत आहे. येथे कोणताच खड्डा चुकविता येत नाही. माळेगावजवळील खड्डेही धोकादायक ठरत आहेत. येथे पुसद, नांदेड, हिंगोली मार्गावरील वाहने थांबतात. रस्त्यावर थाबलेली वाहने व रस्त्यावरील पडलेले खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. माळेगावच्या पुढेही वळणार खड्डे पडल्याने खड्ड्यात दुचाकी आदळून चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच बुजविले होते खड्डे
कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील पडलेले खड्डे काही दिवसांपूर्वीच बुजविले होते. मात्र हे खड्डे बुजवितानाही पुरेशे भरले नसल्याने वाहने जंप करीत आहेत. हे खड्डे बुजल्याने वाहनचालकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा दुसरे खड्डे तयार झाल्याने महामार्ग जैसे थे झाला आहे.
वाहनांचे नुकसान
हिंगोली ते नांदेड या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. त्यामुळे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. मात्र वाहने खड्ड्यात आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. यातूनच अनेकांनी नवीन वाहने घेण्याचा नाद सोडून दिला आहे.
फोटे न. १०, ११