हिंगोली जिल्ह्यातील सहा प्रकल्पांपैकी एकच प्रकल्प पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:05+5:302021-03-09T04:33:05+5:30
हिंगोली: जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्र लक्षात घेता राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्यासाठी सहा प्रकल्पांसाठी मान्यता दिली. त्यानंतर आजमितीस जिल्ह्यातील एक प्रकल्प पूर्ण ...

हिंगोली जिल्ह्यातील सहा प्रकल्पांपैकी एकच प्रकल्प पूर्ण
हिंगोली: जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्र लक्षात घेता राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्यासाठी सहा प्रकल्पांसाठी मान्यता दिली. त्यानंतर आजमितीस जिल्ह्यातील एक प्रकल्प पूर्ण झाला असून, दोन प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत, तर बाकी तीन प्रकल्प शेतकऱ्यांना म्हणावा तसा पैसा मिळत नसल्यामुळे ‘जैसे थे’ आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भाग हा कोरडवाहूमध्येच आहे. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था कुठेही नाही. हे पाहून राज्यपालांनी जिल्ह्यांतील नवलगव्हाण, अंभेरी, हळदवाडी, बोराळा, डिग्रस, सुकळी या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सद्य:स्थितीत नवलगव्हाण हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. या प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत २.७३ दलघमी पाणीसाठा आहे. हळदवाडी या प्रकल्पात १.६८ टक्के पाणी साठा तर अंभेरी लघु प्रकल्पात १.७७ दलघमी एवढा पाणी साठा असून, अंभेरी व हळदवाडी हे प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. हिंगोली जिल्हा हा कोरडवाहू आहे.
जिल्ह्यात १५ हजार १६० हेक्टर क्षेत्र सिंचनाचा अनुशेष भरुन जाहीर केला आहे. यापैकी ८ हजार ३७५ हेक्टर क्षेत्र जलसंपदा विभागाने आणणे अपेक्षित आहे. उर्वरित क्षेत्र जलसंधारण विभागाने पूर्ण करावे, असे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बोराळा, डिग्रस, सुकळी हे तीन प्रकल्प सध्या तरी म्हणावा तेवढा शेतकऱ्यांना मावेजा मिळत नसल्यामुळे प्रकल्पाचे कामच सुरू झालेले नाही. या तीन प्रकल्पांना मान्यता मिळाली असली तरी मोठ्या फरकाने या भागातील शेतकरी पैसा मागत असल्याने प्रकल्पांच्या कामांना सुरुवातच झालेली नाही. सुकळी, डिग्रस या प्रकल्पांचे नकाशे शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले असल्याचे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
बॉक्स
हळदवाडी प्रकल्प
या प्रकल्पाची किंमत २०.९० कोटी एवढी असून, २९८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सदर प्रकल्पात सद्य:स्थितीत १.६८ दलघमी पाणीसाठा आहे.
अंभेरी प्रकल्प
हा प्रकल्प काढला तेव्हा या प्रकल्पाची किंमत ३१.८ कोटी आहे. या प्रकल्पातून २८८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सध्या हा प्रकल्प प्रगतीपथावर असून, १.७७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
नवलगव्हाण प्रकल्प
या प्रकल्पाची किंमत २४.९१ कोटी असून, ४९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. सदरील प्रकल्पात सद्य:स्थितीत पाणीसाठा २.७३ दलघमी एवढा आहे.
प्रतिक्रिया
राज्यपालांनी जिल्ह्यासाठी सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून सहा प्रकल्पांची मान्यता दिली असून, यापैकी एक प्रकल्प पूर्ण केला असून, दोन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी विरोध न करता विकासकामासाठी सहकार्य करणेच योग्य राहील.
-बी. आर. पतंगे,उप-कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, हिंगोली.