हिंगोली : कोरोना बाधितांची संख्या पाहता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तशी कमीच आहे. आजघडीला हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका बाधितामागे २३ अशी आहे. सद्यस्थितीत कोरोनाची संख्या लक्षात घेऊन ट्रेसिंग वाढविण्याची गरज आहे.
मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण हे एका आकड्यावरून दोन आकड्यांवर येऊन ठेपले आहेत. जिल्हा प्रशासन नागरिकांची काळजी घेण्यात तत्पर असले तरी बाधितांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. २३ फेब्रुवारी रोजी ३८ तर २४ फेब्रुवारी रोजी २७ रुग्ण बाधित निघाले आहेत. सद्यस्थितीत एका बाधितामागे २० ते २५ लोकांना ट्रेस केले जाते. हा आकडा यापुढे जास्तीत जास्त कसा केला जाईल यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आजपर्यंत ८९ हजार ३०५ जण तपासले (ट्रेस) गेले आहेत. यामध्ये तपासणीअंती हायरिक्स २७ हजार ९३० तर लोरिक्स ६१ हजार ४०२ निघाले आहेत.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात ते सकाळी सात अशी संचारबंदी लागू केली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण ३ हजार ९८१ आहेत. यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ७६४ असून जिल्हा रुग्णालयात आजमितीस १५८ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ५९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आता ट्रेस जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून चालू आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर वेगवेगळी टीम नेमली आहे, अशी माहिती जिल्हा साथरोगतज्ज्ञ डॉ. इनायततुल्ला खान यांनी दिली.
नागरिकांना आवाहन करूनही ते काळजी घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय नागरिकांना काम असल्याशिवाय बाहेर पडू नका, विनामास्क फिरू नका, असे वारंवार सांगत असून तशा सूचनाही देत आहे. परंतु, नागरिक सूचनांकडे कानाडोळा करीत आहेत. परिणामी रुग्ण वाढत आहेत.
-डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
प्रतिक्रिया
बाधित झालो तेव्हा बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. घरचेही माझ्यापासून दूरच गेले होते. जेवणही एका वेगळ्या ताटात दिले जात होते. पाण्यासाठी वेगळी बॉटल दिली होती. कोरोनाने एक मात्र चांगले केले ते म्हणजे स्वच्छ राहण्याची शिकवण दिली.
कोरोना बाधित झाला म्हणजे तो दूरचा पाहुणा अशीच त्याची ओळख पटू लागली होती. कोरोना बाधित झाल्याचे कळताच मला अनेकांनी भेटणे तर सोडा साधा मोबाईल करणेही सोडून दिले होते. मी मोठा गुन्हा केला की काय, अशी मानसिकता लोकांमध्ये निर्माण झाली होती.
कोरोना मार्च महिन्यात दाखल झाला. यावेळी गाफील राहिल्यामुळे चौथ्या आठवड्यातच कोरोनाने मला पछाडले. मग काय सर्वत्र मला कोरोना झाला अशी बातमी पसरली. त्यानंतर पंधरा-वीस दिवस तर कोणीच जवळ येत नव्हते. घरचेही दूरच राहिले होते.