अरुंद रस्ते, अरुंद गल्लीमुळे वाहने चालविणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:41+5:302021-03-06T04:28:41+5:30

२०११च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर, त्यामध्ये जवळपास १ लाख ७९ ...

Narrow roads, narrow alleys made it difficult to drive | अरुंद रस्ते, अरुंद गल्लीमुळे वाहने चालविणे झाले कठीण

अरुंद रस्ते, अरुंद गल्लीमुळे वाहने चालविणे झाले कठीण

२०११च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर, त्यामध्ये जवळपास १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे, तर शहराची लोकसंख्या १ लाख ८५ हजार एवढी आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे, १९९९ रोजी झाली. यापूर्वी हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये एक मोठा तालुका म्हणून कार्यरत होता. जिल्हा होऊन आजमितीस २२ वर्षे झाले आहेत, परंतु काही कायापालट झालेला दिसत नाही. नांदेड नाका ते गांधी चौक हा रस्ता जर सोडला, तर असा कोणताच मोठा रस्ता हिंगोली शहरात सध्यातरी अस्तित्वात नाही.

तहसील कार्यालय हे अकोला रोडवर असून, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शहराच्या बाजूस नव्याने थाटली गेली आहेत. नगरपालिका, बस स्थानक, अग्निशमन दल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, पोलीस शहर वाहतूक कार्यालये शहरातून जाणाऱ्या अकोला रोडच्या बाजूलाच आहेत.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, कापड गल्ली, मच्छी मार्केट, भाजी मंडई, फुल मार्केट, जलेश्वर परिसर, सोनार गल्ली आदी ठिकाणी गाडी ठेवण्यावरून वादही निर्माण होतात. शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना गाडी कुठे ठेवावी, असा मोठा प्रश्न पडतो. बहुतांश वेळा गांधी चौक येथे वाहन उभे करून खरेदीसाठी दुकानावर यावे लागते. चारचाकी तर सोडा साधी दुचाकीही उभी करता येत नाही. सणावरांच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. शहर वाहतूक पोलीस आल्यानंतर वाहतूककोंडी सुरळीत होते. शहरातील गजबजलेल्या भागात सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वर्दळ असते.

कापड गल्ली कसरतीचे ठिकाण

शहरातील कापड गल्ली हा भाग हिंगोली जिल्हा निर्मिती पूर्वीचा आहे. या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक कपडा खरेदीसाठी येतात. याच गल्लीच्या बाजूला सराफांची दुकाने आहेत. या ठिकाणी चारचाकी वाहन आले की, वाहतुकीची कोंडी होते. अशा वेळेस दुकानदार, तसेच ग्राहकांनाही त्रास सोसावा लागतो.

...तर वाहन मालकांवर कारवाई

वाहन रस्त्यात लावणे व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी १२२ कलमान्वये संबंधित वाहन चालकास २०० रुपये लावला जावू शकतो, परंतु कोणालाही ना दंडाची भीती, ना कारवाईची. बिनधास्तपणे कोणीही कुठेही वाहने उभी करीत आहेत. खरे पाहिले, तर नगरपालिकेने जागोजागी पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, परंतु नगरपालिकेने अजून तरी पार्किंगची व्यवस्था केली नाही. सण, उत्सव आल्यास थोड्या प्रमाणात बांबू लावले जातात. नंतर मात्र ‘जैसे थे’ होऊन बसते. वेळीच नगरपालिकेने लक्ष देऊन पार्किंगचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

शहराची लोकसंख्या - १ लाख ८५ हजार

दुचाकीची संख्या (जिल्ह्याची) १,५३,०९६

चारचाकींची संख्या (जिल्ह्याची) १४,६८२

-

Web Title: Narrow roads, narrow alleys made it difficult to drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.