गुळगुळीत उत्तरांमुळे सदस्यांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:15+5:302021-02-05T07:55:15+5:30

हिंगोली : जिल्हा परिषदेचा ‘पहिले पाढे पंचावन्न’ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुळगुळीत उत्तरे देऊन वेळ मारून नेणाऱ्या ...

Members leave the House due to smooth answers | गुळगुळीत उत्तरांमुळे सदस्यांचा सभात्याग

गुळगुळीत उत्तरांमुळे सदस्यांचा सभात्याग

हिंगोली : जिल्हा परिषदेचा ‘पहिले पाढे पंचावन्न’ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुळगुळीत उत्तरे देऊन वेळ मारून नेणाऱ्या अधिकाऱ्यांना जि.प. सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. उपहासात्मक बोलून, कोपरखळ्या मारत या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. तरीही सुधारणा दिसत नसल्याने सभात्याग केल्याने अध्यक्ष गणाजी बेले यांनी सभा तहकूब केल्याची घोषणा केली.

जि.प. अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखालील या सभेस सीईओ आर.बी. शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, रत्नमाला चव्हाण, रूपाली पाटील, बाजीराव जुंबडे यांची उपस्थिती होती. यावेळी सीएमजेएसवायमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या अभियंत्यांचा मुद्दा पुन्हा गाजला. त्यांचे वेतन न देण्याचा ठराव घेतल्यानंतरही ते का अदा केले, असा सवाल सदस्यांनी केला. त्यावर अतिरिक्त मुकाअ शेंगूलवार यांनी गोलमाल उत्तर देण्याचा केलेला प्रयत्न सदस्यांनी हाणून पाडला. जि.प. सदस्य अंकुश आहेर, अजित मगर, संजय कावरखे हे आक्रमक दिसत होते. जि.प.मध्येच अभियंत्यांची कमतरता असताना या लोकांना तिकडे दिले. मग वेतन तरी का द्यायचे, जि.प.चेच अभियंते नेमणे अनिवार्य आहे का? आदी सवाल केले. मात्र, यात शासन निर्णय व इतर बाबी मिळत नसल्याने शेवटी प्रभारी कार्यकारी अभियंता तांबे यांना दिलगिरी व्यक्त करायला लावली. जि.प. सदस्या वैष्णवी घुगे यांनी प्रशासकीय व विनंती बदल्या मागच्या वेळी का झाल्या नाही, यापुढे होणार की कसे? अशी विचारणा केली. त्यावर मे महिन्यात बदल्या होणार असल्याचे सांगण्यात आले.

लम्पी आजाराबाबत शिबिरे घेऊन गुरांचे लसीकरण करण्यासह या कार्यक्रमांना जि.प. सदस्यांना बोलावण्याचा ठराव झाला होता. तरीही सदस्यांना बोलावले नाही, असा आरोप आहेर यांनी केला. त्यावर आचारसंहितेची अडचण होती. मात्र, यापुढे सर्व कार्यक्रमांना बोलावण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यावर आता पुन्हा लम्पी आजार येणार की काय? अशी गुगली आहेर यांनी टाकली. त्यानंतर ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दाही मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. जि.प.सदस्य अंकुश आहेर यांनी हा मुद्दा मांडला होता. किती ग्रामसेवक मुख्यालयी राहतात, याची माहिती बीडीओंनी सादरच केली नव्हती. हिंगोली बीडीओ पोहरे यांनी ६५ पैकी ३ जण मुख्यालयी राहतात, असे सांगितले, तर वसमत तालुक्यात ८० पैकी २ जण मुख्यालयी राहतात. मात्र, कळमनुरी, औंढा व सेनगावच्या बीडीओंनी विस्तार अधिकाऱ्यांनी माहिती दिली नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याने सदस्य खवळले. ग्रामसेवकाची तक्रार करणे हा हेतू नाही, मात्र, प्रशासन गंभीर नाही, हास्यास्पद कारभार सुरू असल्याची टीका अनिल पतंगे यांनी केली, तर जनतेचे विषय मांडायचे की टाइमपास करायचा, असा सवाल डॉ. सतीश पाचपुते यांनी केला. अजित मगर, संजय कावरखे, विठ्ठल चौतमल यांनीही यावरून धारेवर धरले.

सुरुवातीला जि.प. सदस्य बाळासाहेब मगर यांनी आरोग्य, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन आदी चार विभागांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. यावर आरोग्य विभागाबाबतच्या ठरावाला अजित मगर यांनी आक्षेप घेतला. धूरफवारणी यंत्रांसाठी ११.२३ लाखांचा निधी ५ जूनला मिळाला होता. २५ धूर फवारणी यंत्र मिळाले. मात्र, ते हिवताप कार्यालयात पडून आहेत. यावरून अजित मगर यांनी सवाल केला.

Web Title: Members leave the House due to smooth answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.