तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST2020-12-30T04:39:20+5:302020-12-30T04:39:20+5:30
हिंगोली शहरातील पाणी पुरवठा योजना नवीनच आहे. शहरात २०१४ पासून योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गळती नसल्याने दूषित पाण्याचा ...

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?
हिंगोली शहरातील पाणी पुरवठा योजना नवीनच आहे. शहरात २०१४ पासून योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गळती नसल्याने दूषित पाण्याचा प्रश्न नाही. तरीही काही अडचण होऊ नये, यासाठी दर महिन्यात ४० पाणी नमुने तपासले जातात. शहरात ९ जलकुंभ असून मंगळवारा २, अजयनगर १, पलटन १, खटकाळी बायपास १, गारमाळ १, नेहरूनगर १, आदर्श काॅलेज २ या ठिकाणी आहेत. दररोज ११.५ एमएलडी पाणी शहरातील सर्व जलकुंभांमध्ये भरले जाते. मग या टाक्यांतून ठरावीक दिवशी ठरावीक भागात पुरवठा होतो. १६ प्रभागात ४० पाणी नमुने घेतले जातात. कधी सुरुवातीच्या भागातील तर कधी शेवटच्या भागातील असे रॅण्डम नमुने घेऊन सगळीकडील पाणी तपासले जाते. त्यात काही दाेष आढळला तर दुरुस्ती केली जाते. क्लोरिनचे पाण्यातील प्रमाणही तपासले जाते. त्यातही काही कमी-अधिक आढळल्यास त्यातही बदल केले जातात. याशिवाय जिल्हा रुग्णालयही अधूनमधून नमुने घेते. तेही तपासणी करून काही दोष आढळल्यास कळवतात.
१६ प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुने
पाण्याचे नमुने घेण्यासाठी ठरावीक अशी ठिकाणे निश्चित नाहीत. प्रत्येक वेळी वेगळ्या भागातील नमुने घेतले जातात. आठवड्यात १० नमुने घेतले जातात. शहरात १६ प्रभाग असून त्यातील १० प्रभाग प्रत्येक वेळी नमुने घेऊन सहभागी केले जातात. नगरपालिकांना हे पाणी नमुने घेऊन दूषित पाणी पुरवठा होणार नाही, असे बंधन घालण्यात आले आहे. केंद्र शासनाला याबाबतचा अहवाल पाठविणे बंधनकारक आहे. तो जिल्हा प्रयोगशाळेचाच लागतो.
अशी हाेते तपासणी
नगरपालिकेच्या पथकाकडून सर्वप्रथम पाण्याच्या टाकीवरच नमुने घेतले जातात. आलेले पाणी किती शुद्ध आहे, हे तपासले जाते. त्यानंतर एका पाण्याच्या टाकीवरील पहिल्या टप्प्यातील, मध्यभागातील व टोकाच्या भागातील पाणी नुमने घेतले जातात.
घेतलेले पाणी नमुने जिल्हा प्रयाेगशाळेकडून तपासून घेतले जातात. न.प. शिवाय आरोग्य विभाग व खासगी यंत्रणांकडूनही अनेकदा पाण्याची तपासणी केली जाते.
नगरपालिकेकडून शहराला ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तसेच शुद्ध पाणी पुरवठा करण्याकडे नगरपालिकेचा कटाक्ष असतो. त्यासाठी दरमहा पाणी नमुने घेऊन प्रत्येक प्रभागातील किमान दोनदा पाणी तपासणी केली जाते. दोष आढळत नाही. आढळलाच तर दुरुस्ती केली जाते.
- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, हिंगोली