गतिरोधक बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:17+5:302021-02-05T07:54:17+5:30
गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील बसस्थानकासह आरोग्य उपकेंद्र व जिल्हा परिषद शाळेजवळ कचऱ्याचे ...

गतिरोधक बसविण्याची मागणी
गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील बसस्थानकासह आरोग्य उपकेंद्र व जिल्हा परिषद शाळेजवळ कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. तसेच इतर भागातही घाण साचली आहे. गावातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य असल्याने गावात दुर्गंधी पसरली असून, याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यासाठी गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात खासगी वाहनांचा वावर
हिंगोली : येथील बसस्थानक परिसरात खासगी वाहनांचा वावर वाढला आहे. अनेकदा महामंडळाच्या बसेस बसस्थानकात येत असताना खासगी वाहने अनाधिकृतपणे प्रवेश करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच बससमोर खासगी वाहन येत असल्याने बसचालक व संबंधित वाहनचालकात वादही होत आहे. यासाठी बसस्थानकातील खासगी वाहनांचा प्रवेश बंद करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
येहळेगाव सो. - निशाणा रस्त्याची दुरवस्था
येहळेगाव सो. : औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सो. - निशाणा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावरील गिट्टीही उखडली असल्याने अनेक वाहने घसरुन अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी येहळेगाव सो, निशाणा व परिसरातील अन्य गावांमधून होत आहे.
रस्त्यावर साचले घाण पाणी
हिंगोली : शहरातील जिजामाता नगरातून गायत्री शक्तीपीठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात नळ योजनेचे पाणी साचत असल्याने या भागातील नागरिकांना व वाहनचालकांना रस्त्यावरुन ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच खड्डयातील पाणी खूप दिवसांपासून साचले असल्याने त्यामध्ये डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.
गावात सिमेंट रस्त्याची मागणी
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावातील सर्व भागात मुरूमाचे रस्ते आहेत. या सर्व रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, रस्त्यावरुन चालताना ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. तसेच पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल होतो. त्यामुळे गावामध्ये सिमेंटचे रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
कळमनुरी : तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. हा त्रास मागील दीड ते दोन महिन्यांपासून होत आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमधून महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. तसेच शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित राहात असल्याने शेतीकामे खोळंबत आहेत.
हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा
हिंगोली : शहरातील गांधी चौक हे बाजारपेठेतील मुख्य ठिकाण आहे. याठिकाणी फळासह पाने, फुले व इतर साहित्य विक्रीचे हातगाडे उभे असतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अनेक हातगाडे हे रस्त्याच्या मधोमध व वाहतुकीच्या ठिकाणी उभे करण्यात येत असल्याने वाहतुकीसह नागरिकांना पायी ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. या परिसरात हातगाड्यांना शिस्तीत उभे करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शीतपेयांची विक्री वाढली
वसमत : मागील दहा दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शहरातील ज्युस सेंटर, रसवंती गृह व कोल्ड्रींक्स दुकानांमधील शीतपेयांची विक्री वाढली आहे. तसेच अनेक व्यापारीही आपल्या दुकानात थंड पाण्याचे जार ठेवत आहेत.