इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:51+5:302021-05-06T04:31:51+5:30
हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे इम्युनिटी वाढविणाऱ्या व ऑक्सिजन देणाऱ्या रोपांना ...
हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे इम्युनिटी वाढविणाऱ्या व ऑक्सिजन देणाऱ्या रोपांना मागणी वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने, रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऑक्सिजन, इम्युनिटीचे प्रमाण वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहेत. दवाखान्यात होणारी गैरसोय लक्षात घेता, आता प्रत्येक जण कोरोना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेत आहेत. कोरोना झालाच, तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहावी, ऑक्सिजन लेवल चांगली राहावी, यासाठी फळांचे सेवन करीत आहेत, तसेच इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधा, पुदीना, गुळवेल, आवळा, कांडेवेल, पुत्रजिव्हा, गुंज आदी रोपट्यांसह, ऑक्सिजन देणारे पिंपळ, वड आदी रोपटे खरेदी केले जात आहे.
कोरोना काळात इम्युनिटी वाढविणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची रोपे खरेदीसाठी नागरिक येत आहेत, तसेच सावली देण्यासह ऑक्सिजन मिळणाऱ्या रोपट्यांनाही मागणी आहे. नागरिक दररोज अशी रोपे खरेदी करण्यासाठी येत आहेत.
- शेख महम्मद पाशा, रोपवाटिका चालक
नगरपालिकेच्या रोपवाटिकेत विविध आयुर्वेदिक वनस्पती औषधी रोपांसह इतर ३० हजार रोपे आहेत. कोरोना काळात इम्युनिटी वाढविणाऱ्या रोपांना नागरिकांची मागणी आहे. आगामी काळात १ लाख रोपे तयार केले जाणार असून, यात वनऔषधी रोपांचा समावेश राहणार आहे.
-डॉ.अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न.प. हिंगोली
तुळस : तुळशीचे पाने सेवन केल्याने सर्दी, खोकला, ताप, दांतदुखी, श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुप्फुसांचे रोग, हृदयाचे विकार दूर करण्यास मदत होते. पानांचा सुगंध घेतल्यास, श्वसनतंत्रातील जीवाणूंचे संक्रमण कमी होते. तुळशीचे पाने मधासोबत घेतल्यास गळ्यातील कफ दूर होतो.
अश्वगंधा : अश्वगंधाच्या नियमित सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. अश्वगंधाच्या सेवनाने मेंदूची कार्यप्रणाली चांगली होते. हृदयसंबंधित समस्येपासून वाचता येते. तणाव कमी होतो. डोळ्यांचे आजार दूर होण्यास मदत होते.
पुदिना: पुदिना नियमित खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. पुदिना सेवनाने डोकेदुखी, दातदुखी, वातविकार आदी आजार बरे होण्यास मदत होते. आम्लपित्तातही याचा चांगला उपयोग होतो.
गुळवेल : गुळवेलाचा काढा घेतल्यास शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. सर्दी, खोकला दूर होतो. गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
आवळा : आवळ्याचा रस सेवन केल्यास खोकला, सर्दी, ताप यावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. शरीर निरोगी बनते. रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही आवळा गुणकारी असून, वीर्याचा स्रोत आहे. आवळ्याचा रस सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.