चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली; पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांच्या पुढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST2021-05-05T04:48:54+5:302021-05-05T04:48:54+5:30
हिंगोली जिल्ह्यात मागच्या महिन्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. त्यात जिल्ह्यात मार्च महिन्यात २९ हजार ८०७ जणांच्या चचण्या केल्या होत्या. ...

चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली; पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांच्या पुढेच
हिंगोली जिल्ह्यात मागच्या महिन्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. त्यात जिल्ह्यात मार्च महिन्यात २९ हजार ८०७ जणांच्या चचण्या केल्या होत्या. त्यात २४५२ रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटीचा दर ८.२२ टक्के होता. एप्रिल महिन्यात २० हजार ६०० चाचण्या झाल्या. ३६४३ रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटी दर १७ टक्के होता. मे महिन्यात मागील चार दिवसांचा विचार केला तर चाचण्यांची संख्या घटली असून पॉझिटिव्हिटी दर मात्र २५ टक्क्यांवर आहे.
आता वाढू लागल्या ग्रामीण भागात चाचण्या
पूर्वी कोरोनाचा कहर शहरी भागात जास्त होत्या. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही शहरी भागात तुलनेने जास्त होते. आता ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरले आहेत. अनेक गावांमध्ये अँटिजेन तपासणीचे कॅम्प लावण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण भागातील चाचण्यांचे प्रमाण सध्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व गावातही चाचण्या करून घेण्याची सोय अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील वाढत्या संसर्गामुळे नागरिक हळूहळू जागरुक होत असून कोरोनाची तपासणी करून घेण्याकडेही कल वाढला आहे. त्यातच काही गावांत एकमेकांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्याही होऊ लागल्या आहेत.
आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह
जिल्ह्यात अँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. अँटिजेन चाचण्यांमध्ये तरी काही ठिकाणी कोणतीही लक्षणे नसलेले तपासणी करून घेत आहेत.
आरटीपीसीआरमध्ये मात्र ज्यांना खरोखरच काहीतरी त्रास आहे आणि कोरोनाची जवळपास लक्षणे दिसू लागली आहेत असेच रुग्ण तपासणी करताना दिसतात, तर जास्त विश्वासार्ह म्हणून आरटीपीसीआरकडे कलही जास्त आहे.
ग्रामीण भागातही चाचण्या
शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सध्या ग्रामीण भागातच रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. तर जेथे रुग्ण वाढताहेत असे दिसते, त्या गावात थेट कॅम्प लावला जात आहे.
-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी