धोकादायक रूळ ओलांडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:53+5:302021-02-05T07:53:53+5:30
गॉगलला वाढली मागणी हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला ...

धोकादायक रूळ ओलांडणी
गॉगलला वाढली मागणी
हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला असून, अनेक ठिकाणी वळण रस्ता काढून देण्यात आला आहे. यावरून वाहने जाताच धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे ही धूळ वाहनचालकांच्या डोळ्यात जाऊन डोळ्यांचे आजार वाढत आहेत. त्यामुळे अनेक दुचाकीचालक गॉगलला पसंती देत आहेत.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरात मोकाट जनावरे वाढली आहेत. मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
खिळखिळ्या बसेसने प्रवास
हिंगोली: येथील आगारातून ग्रामीण भागात खिळखिळ्या बसेस सोडल्या जात आहेत. अगोदरच ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खिळखिळ्या बसेसमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागिरकांना तर बसमधून प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चांगल्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
रेल्वेस्थानकावर शुकशुकाट
हिंगोली : अकोला ते पूर्णा मार्गावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली आहे. मोजक्याच रेल्वे धावत असल्या तरी रेल्वे गेल्यानंतर स्थानकावर शुकशुकाट जाणवत आहे. शुकशुकाट जाणवत असला तरी स्थानक चकाचक दिसून येत आहे.
सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब
हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनेक गावांत सौरदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, सौरदिवे बसविल्यानंतर काही दिवसातच सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब होण्यास सुरुवात झाली आहे. आता बहुतांश ठिकाणी सौरदिव्यांचे बल्ब व खांब तेवढे शिल्लक राहिले असल्याचे दिसून येत आहे.
बिबट्याच्या भीतीने शेतकरी भयभीत
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात बिबट्या असल्याची चर्चा आहे. मात्र, तो हिंस्त्र प्राणी बिबट्याच आहे की नाही, हे अद्याप समजले नाही. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शेळी लचके तोडल्याच्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले असून, हिंस्त्र प्राणी कोणता आहे ते शोधावे, अशी मागणी होत आहे.
बस सोडण्याची मागणी
हिंगोली : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मानव विकास मिशनच्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे. बसेस सुरू झाल्यास विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मदत होणार आहे.