आठ दिवसांत ९ जणांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:40+5:302021-03-23T04:31:40+5:30
हिंगोली: जिल्ह्यात गत आठ दिवसांमध्ये कोरोना संसर्गामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ दिवसांमध्ये ६९८ रुग्ण आढळून आले ...

आठ दिवसांत ९ जणांचा कोरोनाने मृत्यू
हिंगोली: जिल्ह्यात गत आठ दिवसांमध्ये कोरोना संसर्गामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ दिवसांमध्ये ६९८ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना अनेकजण मात्र बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसून येत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू केली होती. याकाळात २६५ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर संचारबंदी उठली गेली की, विनामास्क फिरणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. संचारबंदीच्या काळात शहर थांब्यावर बसेस थांबविल्या जात नव्हत्या. आजमितीस पर जिल्ह्यातील बसेस बिनधास्तपणे शहर थांब्यावर थांबत आगारात येत आहेत. बसस्थानकात अँटीजन तपासणी होत असली तरी तपासणीच्या भीतीपोटी काही प्रवासी थांब्यावरच उतरत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा दोन अंकी आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. १२ मार्च रोजी ४९ रुग्ण, १३ मार्च रोजी ६७ रुग्ण, १४ मार्च रोजी ४४ रुग्ण, १५ मार्च रोजी ९३ रुग्ण, १६ मार्च रोजी ७३ रुग्ण, १७ मार्च रोजी ५४ रुग्ण, १८ मार्च रोजी ८७ रुग्ण, १९ मार्च रोजी ४८ रुग्ण, २० मार्च ११३ रुग्ण आणि २१ मार्च रोजी ७० रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने प्रत्येक नागरिकाने स्वत:बरोबर इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
९ जणांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांतही झपाट्याने वाढ होत आहे. १५ मार्च रोजी १, १६ मार्च रोजी १, १७ मार्च रोजी २, १८ मार्च रोजी २, १९ मार्च रोजी १, २० मार्च रोजी १ आणि २१ मार्च रोजी १ जण कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावला आहे.
बसस्थानकात तपासणी सुरुच
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस आढळून येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने बसस्थानकात १ मार्चपासून अँटीजन तपासणी सुरु केली आहे. बसस्थानकातील तपासणीचा आढावा घेतला असता अँटीजन तपासणीत ४५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बसस्थानकात तपासणीसाठी डॉ. जावेद अतहर, स. इमरान अली, आरती धोबी, राजेश जाधव, पवन खरात आदी सहकार्य कार्य करीत आहेत.