१०५ गावांत कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:09+5:302021-04-18T04:29:09+5:30
कळमनुरी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कळमनुरी तालुक्यातील १०५ गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. तसेच कोरोनाचा उद्रेक वाढल्याने ...

१०५ गावांत कोरोनाचा शिरकाव
कळमनुरी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कळमनुरी तालुक्यातील १०५ गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. तसेच कोरोनाचा उद्रेक वाढल्याने आतापर्यंत तालुक्यातील ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कळमनुरी तालुक्यात कोरोनाचे संकट वर्षभरापासून कायम आहे. मध्यंतरी रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीला शहरी भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर याचे लोण तालुकाभर पोहोचले आहे. आतापर्यंत १५५ गावांपैकी तब्बल १०५ गावात कोरोना पसरला आहे. यातील ६० गावातील रुग्ण बरे झाले असले तरी सध्या ४५ गावात रुग्ण कायम आहेत. तालुका प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी तालुक्यात आतापर्यंत २ हजार ३६७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २०८६ रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील १४ हजार ६८७ जणांचे स्वॅब नमुने घेतले होते. तसेच १३ हजार ७०५ जणांची ॲन्टीजेन तपासणी केली होती. यात २ हजार ३६७ रुग्ण कोरोनाचे आढळून आले. सध्या ७८२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रलंबित आहेत.
तालुक्यात ४५ गावे कोरोना बाधित
तालुक्यात सध्या ४५ गावांमध्ये रुग्ण आढळून आलेले आहेत. यात आखाडा बाळापूर, सोडेगाव, कांडली, बाभळी, सिंदगी, वारंगा, सुकळी, चुंचा, सालेगाव, डिग्रस कों., रेडगाव, वरूड, हिवरा, मोरवड, घोडा, डिग्रस, कोंढूर, डोंगरकडा, जवळा पां., पार्डी, येहळेगाव तु., रेणापूर, जुनी चिखली, सालापूर, पोतरा, जांब, येहळेगाव ग., दाती, जामगव्हाण, कान्हेगाव, बेलथर, नांदापूर, वाकोडी, वडगांव, जरोडा, आडा, कामठा, कुंभारवाडी, माळेगाव, पाळोदी, मोरगव्हाण, सांडस, देवजणा या गावांचा समावेश आहे.
तालुक्यात ४७ रुग्णांचा मृत्यू
कळमनुरी तालुक्यात आतापर्यंत ४७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात बाहेर तालुक्यात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला असून तालुक्यात ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४० रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे
तालुक्यातील जवळपास ७४.१९ टक्के गावात कोरोना पसरला आहे. रुग्ण मृत्यूचे अर्धशतक होत आले तरी आजाराचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. प्रशासन वारंवार सूचना देत असून कारवाईचा बडगाही उगारत आहे. मात्र, तरीही अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे असून मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.