कोरोना चाचण्या न केलेल्या १३ दुकानांना बसविला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST2021-04-16T04:30:03+5:302021-04-16T04:30:03+5:30
हिंगोली : आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी न करणाऱ्या शहरातील १३ दुकानांना १ हजार तर विनामास्क फिरणाऱ्या ७ नागरिकांना ५०० ...

कोरोना चाचण्या न केलेल्या १३ दुकानांना बसविला दंड
हिंगोली : आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी न करणाऱ्या शहरातील १३ दुकानांना १ हजार तर विनामास्क फिरणाऱ्या ७ नागरिकांना ५०० रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला. ही कारवाई नगर परिषद व पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आली.
कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजवला आहे. रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे पाहून शासनाने पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १५ एप्रिल रोजी नगर परिषद व पोलीस विभागाच्या पथकाने शहरातील इंदिरा चौक, मेडिकल लाईन, भाजी मंडई आदी भागातील १३ दुकानांना आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी न केल्याप्रकरणी १ हजार रुपयाप्रमाणे दंड ठोठावला आहे. या १३ दुकानदारांकडून दंडापोटी १३ हजार रुपये वसूल केले आहेत, तर मास्क न घालणाऱ्या ७ लोकांंना पाचशे रुपये प्रमाणे दंड लावला.
संचारबंदी लागू केलेली असताना पहिल्याच दिवशी अनेक नागरिक विनामास्क व मेडीसीनच्या नावाखाली राजरोसपणे फिरताना आढळून येत होते. हे पाहून पोलिसांनी मोक्याच्या ठिकाणी बॅरिकेटिंग टाकण्यासाठी सुरुवात केली आहे. चौक व गल्लीबोळामध्ये बॅरिकेटिंग टाकून रस्ते बंद केले आहेत.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना सद्यस्थितीत भाजी मंडईमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. काही दिवसांपासून भाजी मंडई गर्दीचे ठिकाण बनले आहे. पालेभाज्या सर्वच नागरिकांना मिळाव्यात म्हणून शहरात आठ ठिकाणी भाजी विक्री केंद्र उभारण्यात आली होती. परंतु, काही दिवसांतच ही सर्वच्या सर्व केंद्र गुंडाळली गेली आहेत. मोठे व छोटे व्यापारी आजही भाजी मंडईतच गर्दी करताना दिसून येत आहेत. शहरात निर्माण केलेल्या भाजी मंडईत काहीच सुविधा नाहीत, अशी तक्रार भाजी मंडईत बसणाऱ्या व्यापाऱ्यांनी केली आहे.
संचारबंदीसदृश स्थिती नाही
कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे शासनाने पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. परंतु, कोणते ना कोणते कारण पुढे करत काही जण बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. काही नागरिक तर रुग्णालय व मेडिसीनचे कारण पुढे करत पथकाच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा प्रयत्न करुन पुढे जाण्याचा मार्ग सुकर करीत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने कडक सूचना दिलेल्या असतानाही काही नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करीत आहेत.
विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड
कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्यामुळे शासनाने विनामास्क फिरणाऱ्यांंना २०० रुपये दंड लावण्याची जबाबदारी नगर परिषदेवर दिली होती. तरीही लोकांचे फिरणे काही संपत नाही. हे पाहून शासनाने आता त्यात ३०० रुपयांची वाढ करुन ५०० रुपये असा दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल रोजी विनामास्क फिरणाऱ्या ७ नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, पोलीस निरीक्षक पाटील, पंडित मस्के यांनी केली.