अस्ताव्यस्त वाहनामुळे रहदारीस अडथळा
कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून रहदारी वाढली आहे. परंतु, काही वाहनधारक या वर्दळीच्या रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेला वेळोवेळी याबाबत सांगण्यात आले. परंतु, अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेेले दिसत नाही. रहदारी सुरळीत करण्यासाठी मोकळया जागी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
कळमनुरी शहरात वीज खंडित; ग्राहक त्रस्त
कळमनुरी : शहरातील सहयोगनगर, गणेशनगर, रेणुकानगर, विकासनगर, भाजी मंडई, जुना बसस्थानक, माळी गल्ली, आठवडी बाजार आदी भागामध्ये पंधरा-वीस दिवसांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.