९ नळयोजनांचे प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:40 IST2019-03-07T00:38:44+5:302019-03-07T00:40:40+5:30

राष्ट्रीय पेयजल योजनेतील ८७ गावांच्या मंजूर आराखड्यातील ९ कामांना आता तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. १ कोटी रुपयांपर्यंतची ही कामे असल्याने मुख्य अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली आहे.

9 Plot Proposal Approved | ९ नळयोजनांचे प्रस्ताव मंजूर

९ नळयोजनांचे प्रस्ताव मंजूर

ठळक मुद्दे२९ गावांचे प्रस्ताव तांत्रिक समितीकडे

हिंगोली : राष्ट्रीय पेयजल योजनेतील ८७ गावांच्या मंजूर आराखड्यातील ९ कामांना आता तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. १ कोटी रुपयांपर्यंतची ही कामे असल्याने मुख्य अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा ८७ गावांचा आराखडा मंजूर झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने पुढील कारवाई ठप्प झाली होती. त्यामुळे अंदाजपत्रके तयार करणे, त्यांची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेणे ही कामे करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हते. शिवाय मुख्यमंत्री पेयजलमधील गावांची कामेही निधीअभावी ठप्प असल्याचेच चित्र होते. तर काही कामांना तांत्रिक त्रुटींनी ग्रासले होते. शिवाय १ कोटीपेक्षा जास्त रक्कमेची कामे थेट मंत्रालयापर्यंत जात असल्याने तेथून मंजुरी मिळविणेही तेवढे सोपे नव्हते. तर ८७ गावांचा आराखडा मंजूर झाल्यावरही फारसी प्रक्रिया गतिमान न झाल्याने नव्याने रुजू झालेले के.आर. लिपने यांनी नंतर या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. १ कोटीपेक्षा कमी दराचे प्रस्ताव लागलीच तयार केले. अशा २९ गावांचे प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ९ गावांना पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळाली आहे.
यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा, संघानाईक तांडा, वसमत तालुक्यातील धामणगाव, रिधोरा, कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा, रुद्रवाडी, सेनगाव तालुक्यातील माहेरखेडा, उटी ब्रह्मचारी, शेगाव या गावांचा समावेश आहे. उर्वरित गावांचे प्रस्तावही लवकरच मार्गी लागतील, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. तर प्रशासकीय मान्यता मुख्य कार्यकारी अधिकारीच देणार आहेत. यंदा कामे करणे शक्य नसल्याने ८७ गावे पुन्हा २0२0-२१ च्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
तीन योजना : कार्यारंभ आदेश दिले
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथील योजना जि.प.उपाध्यक्ष असताना राजेश्वर पतंगे यांनी मंजुरीत आणली. मात्र मागील तीन वर्षांपासून रखडलेली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे यात मोठा व्यत्यय येत होता. चार ते पाच वेळा या कामाची निविदा निघाली. मात्र जाणीवपूर्वक कमी दराची निविदा भरण्याचा प्रकार अडसर ठरत होता. अखेर या योजनेची निविदा मंजूर झाली. तसेच कार्यारंभ आदेशही दिला. या योजनेसह येहळेगाव व सोमठाणा येथील योजनांचा कार्यारंभ आदेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे तीन योजना मार्गी लागल्या आहेत.

Web Title: 9 Plot Proposal Approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.