पाचवी ते आठवीच्या जिल्ह्यातील १६ शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:32+5:302021-02-05T07:54:32+5:30
कळमनुरी : कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियम व अटीच्या अधीन राहून जिल्ह्यातील १६ शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या ...

पाचवी ते आठवीच्या जिल्ह्यातील १६ शाळा सुरू
कळमनुरी : कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियम व अटीच्या अधीन राहून जिल्ह्यातील १६ शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या ८९९ शाळा असून ८३ हजार ६५१ विद्यार्थी संख्या आहे. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने शाळा सुरू करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील ‘सर्व शाळा आपली शाळा’ सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव २९ व ३० जानेवारी रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, शाळेतील विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, पालकांचे संमतिपत्र, शाळा व्यवस्थापन समितीचे संमतिपत्र व सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचण्या झाल्यात का, आदीबाबतच्या माहितीचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. नंतर शिक्षणाधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच शाळा सुरू होणार आहेत. येत्या सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जिल्ह्यातील आणखी काही शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्या स्वच्छ करणे व सॅनिटायझर कराव्या लागणार आहेत.
पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १९ जानेवारी रोजी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कोरोनाच्या महामारीमुळे मागील मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. १८ जानेवारी रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासाठी सूचित केले होते. या पत्राचा आधार घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शाळा सुरू करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोरोनाबाबतच्या शासनाने दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून उर्वरित शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू केल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, हात सॅनिटायझर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. २७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सोळा शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. उर्वरित शाळा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत पालकांची संमतिपत्र व शाळा व्यवस्थापन समिती ठराव असणे आवश्यक आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकही संमतीपत्र देत आहेत. घरी बसून विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळे शाळा सुरू झालेल्या बऱ्या असे विद्यार्थी सांगत आहेत. कोरोनाचे भय अजूनही गेलेले नाही. घरी बसून कंटाळलेले विद्यार्थी शाळेत गेलेले बरे असे सांगत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतरही कोरोनाच्या नियमाचे पालन प्रत्येकाला करावे लागणार आहे.
आतापर्यंत काही शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत होते. ऑनलाइन धडे देत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहूनच शिक्षणाचे धडे घेतलेले बरे असे विद्यार्थ्यांना वाटत आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन सात ते आठ महिन्यांचा कालावधी संपलेला आहे. तुटपुंज्या वेळेत अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा, असा प्रश्न शिक्षकांसमोर पडलेला आहे. जादा तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल, असे काही शिक्षक सांगत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने लवकरच जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी सांगितले.