भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 07:04 IST2026-04-10T07:04:30+5:302026-04-10T07:04:58+5:30
९४ टक्के मृत्यू हे गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील मुलांचे आहेत

भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
लंडन: जगभरातील लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण ही एक गंभीर व वाढती चिंता बनली आहे. ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०२३’ च्या अहवालानुसार, मुलांच्या कर्करोगाशी संबंधित मृत्यूंपैकी ९४ टक्के मृत्यू हे गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होत आहेत.
भारतातही २०२३ मध्ये सुमारे १७,००० मुलांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मुलांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये कर्करोग आता १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या संकटात दक्षिण आशिया हे मोठे केंद्र बनले आहे. जगातील एकूण बालपण कर्करोग मृत्यूंपैकी २०.५ टक्के मृत्यू एकट्या दक्षिण आशियात नोंदवले गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १९९० ते २०२३ या काळात या मृत्यूच्या प्रमाणात १६.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गरीब देशांमध्ये वेळेवर तपासणी आणि उपचारांचा अभाव ही मुलांच्या बचावामध्ये मोठी अडचण ठरत आहे.
गोवर व टीबीपेक्षाही घातक
अहवालानुसार, २०२३ मध्ये जगभरात मुलांमध्ये कर्करोगाची ३.७७ लाख नवीन प्रकरणे समोर आली, तर १.४४ लाख मुलांचा मृत्यू झाला. कर्करोग आता मुलांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये समाविष्ट झाला आहे.
राष्ट्रीय कार्यक्रमात दुर्लक्ष
भारतात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमात अद्याप बालपणातील कर्करोगाला प्राधान्य दिलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, हा धोका कमी करण्यास याचा राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण योजनेत तातडीने समावेश करणे गरजेचे आहे.
- जगभरात २०२३ मध्ये मृत्यू - १.४४ लाख मुले
- भारतातील स्थिती १७,००० मृत्यू
- मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९४% मृत्यू
- दक्षिण आशियाचा वाटा एकूण जागतिक मृत्यूंच्या २०.५%