जि.प.च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार

By Admin | Updated: June 19, 2016 01:31 IST2016-06-19T01:31:23+5:302016-06-19T01:31:23+5:30

अनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, ...

ZP employees will be disciplined | जि.प.च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार

जि.प.च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार

सीईओ पुलकुंडवार : वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त करणार
मनोज ताजने गोंदिया
अनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, अर्थात मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वीच रूजू झालेले डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी अवघ्या काही दिवसातच आपल्या कामाची छाप पाडली आहे. थेट आयएएस असलेल्या अभिषेक कृष्णा यांच्यानंतर मधल्या काळातील सीईओंकडून अपेक्षित कामकाज झाले नसले तरी डॉ.पुलकुंडवार यांनी जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कामकाजाची दिशा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.
जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पहिल्यांदाच सूत्रे हाती घेतल्यानंतर समोर कोणती आव्हाने आहेत, यावर ते म्हणाले, मुळात या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी आहे. मानव विकास निर्देशांकही कमी आहे. त्यामुळे थोडी नैसर्गिक आपदा आली की लोक घाबरतात. कारण लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. वास्तविक हा जिल्हा पाणी आणि नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत संपन्न आहे. तरीही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुबार पीक घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. शेतकऱ्यांना दुबारच नाही तर तिबार पीक घेण्यासाठीही संधी आहे. त्यासाठी त्यांना सिंचनाची पुरेशी व्यवस्था करून देऊन त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.
शेतकऱ्यांनी केवळ धानपिकावर अवलंबून न राहता पाण्याचा योग्य वापर करून नगदी पिके घेतली पाहीजे. याशिवाय शेतीपुरक व्यवसायाकडेही वळले पाहीजे. शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे, असे डॉ.पुलकुंडवार म्हणाले.
जुन्या तलावांना पुनरूज्जिवित करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने ४१७ कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ४४ पूर्णही झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल.
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांना शिस्त नाही. नागपूरवरून अप-डाऊन करणाऱ्या ‘विदर्भवीरां’ना कसे वठणीवर आणणार यावर सांगताना ते म्हणाले, ही बाब माझ्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या आहेत. तोपर्यंत मी अनेक ठिकाणी सरप्राईज व्हिजीट सुरू केल्या आहेत. अचानक कोणत्या विभागात किंवा जिल्ह्यातील एखाद्या कार्यालयात भेट दिल्यानंतर तेथील हजेरी रजिस्टर तपासून गैरहजर असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देणे सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना, वाहनचालकांना ड्रेस कोड असताना कोणीही त्याचा वापर करीत नाही याकडे लक्ष वेधले असता त्यांनी याबाबतची नोटीस लगेच काढली जाईल, असे सांगून सर्व कर्मचारी, अधिकारी शिस्तीत वागतील असा विश्वास व्यक्त केला.
शिक्षण विभागातील गोंधळाची स्थिती गेल्या काही महिन्यात सावरायला लागली असून लवकरच बिंदूनामावली निश्चित होईल. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसह इतर सर्व विषय मार्गी लागतील, असे डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. मात्र कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कुठेही काम करण्याची तयारी ठेवावी. तशी मानसिकता सर्वांना तयार केली पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: ZP employees will be disciplined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.