रोहयोच्या कामाने केली शेतकर्यांची फजिती
By Admin | Updated: May 23, 2014 23:58 IST2014-05-23T23:58:17+5:302014-05-23T23:58:17+5:30
पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे.

रोहयोच्या कामाने केली शेतकर्यांची फजिती
काचेवानी : पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे. धान पीक तोंडावर येत असताना शेतकर्यांच्या तोंडाचे पाणी सुकायला लागते. अशीच परिस्थिती यावेळी दिसून येत आहे. यावर्षी सगळीकडे उन्हाळी धानाचे पीक भरपूर प्रमाणात घेतले जात आहे. धानाचे पीक यायला लागले, धान कापणीला आले, परंतु यावेळी परिसरात मग्रारोहयोची कामे सुरु असल्याने आणि मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. धानाची कापणी कशी करावी, मळणी कशी करावी, या समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन दिवसानंतर रोहिणी नक्षत्र लागणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्रामध्ये पावसाळा सुरु झाल्याचे चिन्ह असतात. जेम-तेम धान कापणी सुरु झाली असून मळणीकरिता आठ दिवस लागतील. त्यामुळे रोहयोची कामे आठ दिवसाकरिता बंद करण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतने करणे गरजेचे झाले आहे. रोहयोचे ज्या ठिकाणी कामे आहेत आणि त्या ठिकाणी उन्हाळी धान पीक घेतले आहे, अशा गावातील सुरु असलेली रोहयोची कामे बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. निसर्ग तर कुणाचे ऐकून घेत नाही. परंतु आपण सर्व समजून-ऐकून घेणारे आहोत. त्यामुळे वर्तमान समस्येला आणि नुकसानीला पाहता शेतकर्यांच्या कष्टाची आणि अन्नाची नासाडी थांबविण्याकरिता काही दिवसांसाठी रोहयोची कामे थांबविण्यात यावी, अशी शेतकर्यांची मागणी आता जोर धरत आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली होती. त्याचा परिणाम असा झाला की, शेतकरी उन्हाळी धान पिके कापू शकले नाही. ज्यांनी कापले त्यांनी मळणी केली नाही, पावसाच्या पाण्यामुळे शेतातील धानपीक खराब झाले होते. काही शेतकर्यांनी त्या खराब झालेल्या धान पि काचीसुद्धा मळणी केली. असे करता-करता आलेले पीक मातीमोल झाले. यावर्षीची परिस्थिती अशीच दिसून येत आहे. शेतकर्यांच्या हिताकरिता रोजगार हमी योजनेची कामे बंद करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. (वार्ताहर)