बाक्टी येथे वादळी पावसाचा तडाखा

By Admin | Updated: May 30, 2016 01:37 IST2016-05-30T01:37:53+5:302016-05-30T01:37:53+5:30

जवळच्या बाक्टी-चान्ना येथे शुक्रवार (दि.२७) दुपारी ३ वाजता दरम्यान आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने गावातील राहत्या...

Windy rains at Bakti | बाक्टी येथे वादळी पावसाचा तडाखा

बाक्टी येथे वादळी पावसाचा तडाखा

घरांची पडझड : त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी
बोंडगावदेवी : जवळच्या बाक्टी-चान्ना येथे शुक्रवार (दि.२७) दुपारी ३ वाजता दरम्यान आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने गावातील राहत्या घरांची व गोठ्यांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली. गावातील नुकसानग्रस्तांना प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जितेंद्र शेंडे यांनी केली आहे.
यावर्षी बाक्टी गावामध्ये सातत्याने निसर्गाचा प्रकोप वाढलेला दिसून येत आहे. शुक्रवारला दुपारी ३ वाजतापासून वादळ वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या वादळाच्या रौद्र रुपाने गावातील मोठ्या प्रामणात घरावरील गावठी कवेलू व फाट्यांचे नुकसान झाले. कौलारू घरांचे जास्तीत जास्त नुकसान झाले. वारंवार होणाऱ्या वादळाच्या नुकसानीमुळे बाक्टीवासीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
शुक्रवारी वादळवाऱ्यासह पावसाने हिवराज राजगिरे, अंजना चवरे, प्रेमलाल भोयर, मीरा मेश्राम, ग्यासराम राजगिरे, गोदु भोयर, उमराव बोरकर, ताराचंद वझे, महादेव भोयर, सुखदेव सांगोळे, बारकू बोरकर, रंजित मेश्राम आदिंच्या घरावरील कवेलू, फाट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरावरील कवेलू रस्ताभर पसरले. सिमेंटचे पत्रे उडून फुटले. शेतामधील झाडे मुळासकट कोसळले. विजेच्या तारा तुटून गेल्याने गावकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागली. बातमी लिहिपर्यंत गावामध्ये विजेचा पुरवठा सुरू झालेला नव्हता.
मागील महिन्यात ५ तारखेलासुद्धा आलेल्या जबरदस्त चक्रीवादळाने अख्या गावकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना अजूनपावेतो आर्थिक सहाय्य मिळाले नाही. पैशाची जमवाजमव करुन त्यावेळी महागडे कवेलू घेऊन घरांची दुरुस्ती केली होती. एक महिना होत नाही तर पुन्हा वादळाने कहर केला. झालेल्या नुकसानीमुळे बाक्टी गावकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी म्हणण्याची वेळ आलेली दिसत आहे. वादळ वाऱ्यांने क्षतीग्रस्त झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन प्रशासनाने ताबडतोब आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच जितेंद्र शेंडे यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. घरांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने बाक्टी ग्रामवासीयांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सरपंच सुभाष मेश्राम यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Windy rains at Bakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.