विकासासाठी हवा विदर्भ वेगळा
By Admin | Updated: February 3, 2016 01:55 IST2016-02-03T01:55:53+5:302016-02-03T01:55:53+5:30
सन १९९७ ला भाजपाने भुवनेश्वरला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तारुढ

विकासासाठी हवा विदर्भ वेगळा
राम नेवले : विदर्भ राज्यासाठी ३१ मार्चला दिल्लीत विशाल आंदोलन
तिरोडा : सन १९९७ ला भाजपाने भुवनेश्वरला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तारुढ पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी आमच्या केंद्रात राज्य आल्यास आम्ही वेगळा विदर्भ देऊच, असेही ठोस आश्वासन विदर्भाच्या जनतेला दिले. विदर्भातील जनतेनेही आश्वासनावर विश्वास ठेऊन विदर्भातून ४४ आमदार निवडून दिले. त्यामुळेच महाराष्ट्रात सत्ता मिळाली व केद्रातही सत्ता प्राप्त झाली. परंतु आता आश्वासन देणारे नेते विदर्भ राज्य विसरून गेले व विदर्भ विकासाच्या गप्पा मारीत आहेत, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले म्हणाले.
स्थानिक पोलीस स्थानकासमोर आयोजित सभेत ते बोलत होते.
नेवले पुढे म्हणाले, देशातील सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली आहे. अशा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रात राहून राज्यकर्ते कितीही विकासाचे बोल बोलत असले तरी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास केवळ अशक्य आहे. वेगळे विदर्भ राज्य हेच विदर्भ राज्याचे विकासाचे मूलमंत्र आहे, असे परखड मत त्यांनी सभेत व्यक्त केले.
ते म्हणाले, वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन विदर्भाच्या जनतेशी विश्वासघात करणे हे सत्तारुढ पक्षाला महागात पडेल, म्हणून वेगळ्या विदर्भ राज्याच्या प्रक्रियेला त्वरित सुरूवात करावी अन्यथा विदर्भ राज्य आंंदोलन समिती विदर्भ राज्याचे आंदोलन अजून तीव्र करेल. १८ मार्चला नागपूर येथे विदर्भस्तरीय विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विदर्भ राज्य परिषद घेण्यात येत आहे. ३१ मार्चला दिल्ली येथे विशाल धरणे आंदोलन करण्यात येणार असून दिल्ली येथे पंतप्रधान नरेद्र मोदी व गृहमंत्र्यांना भेटून विदर्भ राज्य निर्मितीची आठवण करून देऊन राजधानीत स्वतंत्र विदर्भाचे बिगूल गाजविण्यात येणार आहे, असे राम नेवले यांनी सांगितले.
डॉ.कृष्णकांत दुबे यांनी विदर्भाच्या निर्मितीसाठी बलिदानाची गरज पडत असल्यास माझे बलिदान मी प्रथमत: देण्यास तयार असल्याचे सांगितले. तर वेगळ्या विदर्भाची आवश्यकता का आहे, यावर अॅड. नंदा पराते, अरविंद देशमुख, दिलीप नरवडिया, अर्चना नंदघले, रमेश ढोमणे, गुरमित चावला, डी.आर. गिरीपुंजे, रफीक शेख, सुरेश धुर्वे, गजानन बारापात्रे, सुनिता बारापात्रे, राधेश्याम नागपुरे यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम राम नेवले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. संचालन शामराव झरारिया यांनी केले. आभार पंडित तिवारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी अनिल अंबुले, गौरव झरारिया, शामराव भोंडेकर, दुर्गेश कापसे, पंकज हटवार, पवन लांजेवार, पिंटू भगत, राजकुमार फटिंग, सहादेव आमकर यांनी तसेच कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)