मजुरीला जाणार की नागपूरला?

By Admin | Updated: December 6, 2014 22:50 IST2014-12-06T22:50:05+5:302014-12-06T22:50:05+5:30

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर येऊन ठेपली आहे. मात्र विशेष समाजकल्याण कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज सरळ नागपूर कार्यालयात मागविण्यात येत आहेत.

Will the laborer go to Nagpur? | मजुरीला जाणार की नागपूरला?

मजुरीला जाणार की नागपूरला?

संतप्त विद्यार्थ्यांचा सवाल : ‘लोकमत’च्या परिचर्चेत जात पडताळणीवरील सूर
गोंदिया : बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर येऊन ठेपली आहे. मात्र विशेष समाजकल्याण कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज सरळ नागपूर कार्यालयात मागविण्यात येत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७ हजार ५०० विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. परीक्षेच्या तोंडावर आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास सहन करीत असलेल्या या विद्यार्थ्यांवर ही परिस्थिती कशी उद्भवली, त्यावर काय उपाययोजना होऊ शकतात याबद्दल सदर विद्यार्थ्यांची परिचर्चा ‘लोकमत’ने आयोजित केली. त्यात त्यांनी व्यक्त केलेला संताप सरकारी यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारा होता.
स्थानिक एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात आयोजित या परिचर्चेत विद्यार्थिनींनी समाजकल्याण विभागावर कडाडून टिका केली. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी विशेष समाजकल्याण कार्यालयाने एकही जात पडताळणी प्रमाणपत्राचे शिबिर घेतले नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांमार्फत विशेष समाजकल्याण कार्यालयात घेण्यात येत होते. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी दोन वेळा शिबिर घेतले जात असत. परंतु यावर्षी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी एकही शिबिर घेण्यात आले नाही. उलट विद्यार्थ्यांना आपापले प्रस्ताव घेऊन पालकांसह नागपूरला उपस्थित राहण्यास सांगण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल भागातील अनेक विद्यार्थ्यांनी नागपूरच पाहिले नाही. आई-वडीलांंना दररोज मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. मग ते मजुरीसाठी जाणार की मुलांचे शैक्षणिक प्रमाणपत्र (जात पडताळणी प्रमाणपत्र) तयार करण्यासाठी नागपूरला जाणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी पैसे खर्च करून व खस्ता खात नागपूर कार्यालयात पोहोचले तरी दिवसभर उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागते. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांचा क्रमांक, कागद पडताळणीसाठी लागला आणि एखादा कागद कमी पडला तर त्या विद्यार्थ्याला रिकाम्या हाताने गावाला परतावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे.
परीक्षेच्या तोंडावर समाजकल्याण कार्यालय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी टेंशन देत आहे. विशेष समाजकल्याण कार्यालयाने जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारून शिबिरे आयोजित करावी व विद्यार्थ्यांचा त्रास वाचवावा, अशी मागणी या परिचर्चेतून विद्यार्थ्यांनी केली आहे.
सदर परिचर्चेत विद्यार्थ्यांमध्ये निधी चंद्रिकापुरे, वैशाली कांबळे, प्रियंका बिसेन, पूजा पटले, ज्योती कटरे उपस्थित होत्या. सोबत प्रा.एस.एफ. तितीरमारे, प्रा. गणेश मेहता, प्रा.संजय कळंबे, प्रा. वंदना जिभकाटे, प्रा. रुखसाना हसन उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Will the laborer go to Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.