पोकळी भरण्यासाठी भाजपला खंबीर नेतृत्व लाभेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 00:24 IST2016-07-25T00:24:46+5:302016-07-25T00:24:46+5:30
भाजपचे सालेकसा तालुक्यातील दिग्गज नेते राकेश शर्मा यांचे वयाच्या ६० व्या वर्षी आजारांमुळे अकाली निधन झाले.

पोकळी भरण्यासाठी भाजपला खंबीर नेतृत्व लाभेल का?
विजय मानकर सालेकसा
भाजपचे सालेकसा तालुक्यातील दिग्गज नेते राकेश शर्मा यांचे वयाच्या ६० व्या वर्षी आजारांमुळे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने सालेकसा तालुक्यात भारतीय जनता पक्ष अनाथ झाल्याचे वाटत आहे. शर्मा यांच्या खंबीर नेतृत्वापुढे पक्षाचे नेते व कार्यकर्ते नतमस्तक होत होते. तसेच विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा सलाम ठोकत होते. कारण राकेश शर्मा यांची नेतृत्वशैली सर्वांना प्रभावित करणारी होती.
लोकशाही पद्धतीने राजकारण करीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांची कर्मठता, पक्षनिष्ठपणा व माणसे जोडण्याची शैली एवढी जबरदस्त राहिली की सामान्य माणसापासून शीर्ष नेतृत्वापर्यंत शर्मा यांचे कायमचे प्रतिबिंब उमटले आहे. अशात आता सालेकसा तालुक्यात भाजपला सांभाळणारे खंबीर नेतृत्व सहज मिळणे कठीण आहे. एकीकडे भाजप या संकटातून सावरण्यासाठी सर्व पर्यायांवर विचारमंथन करीत आहे, तर दुसरीकडे इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपला दमदार पर्याय देवून आपला पक्ष मजबूत होईल आणि आपले नेतृत्व तालुक्यात दिसून येईल असे स्वप्न पडू लागले आहे. तसे होणे स्वाभाविक आहे. राजकारणात कोण केव्हा कोणाच्या समोर येईल हे सांगता येत नाही. काही लोक आता हे ही समजून बसले आहेत की भाजप आता कमजोर होऊ शकते आणि आपल्या पक्षाची स्थिती भक्कम होऊ शकते.
स्वप्न बघा, मोठे व्हा, आपल्या राजकारणाचा प्रभाव जनमानसावर पडू द्या, परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, की कधी एखाद्या चांगल्या नेतृत्वामुळे पक्षाला बळकटी मिळत असते. परंतु नेतृत्व देण्यासाठी पक्ष सुद्धा महत्वाचा घटक असतो. पक्षाने संधी दिली तर सामान्य नेताही खास बनू शकतो. आजघडीला भारतीय जनता पक्ष देशाचा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला प्रखर विचारधारा लाभलेली आहे. त्यामुळे भाजपच्या विचारसरणीचा अंगीकार करणाऱ्या जनसामान्य लोकांची मोठी फळी आहे. म्हणून भाजप कमजोर होईल असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणारे वाटत आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये कोणताही पक्ष चिरकाळ सत्तेवर टिकून राहत नाही. परंतु त्याचबरोबर पक्ष पराभूत झाला म्हणजे पक्ष संपला असे समजून चालणेही मुर्खपणा ठरू शकते.
या तालुक्यात सतत भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष एकमेकाला पर्याय देऊ शकले आहेत. यामध्ये तालुक्यातील दोन परिवाराची ऐतिहासिक भूमिका राहीली आहे. भाजप हा वशिष्ठ परिवाराच्या घरी तर काँग्रेस पक्ष बहेकार परिवारात केंद्रीत राहीला. वशिष्ठ कुटुंबातून तिघांना पं.स. सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली तर बहेकार कुटुंबातून दोन आमदार घडले. काही काळ मंत्रीपदही लाभले.
सालेकसा पंचायत समितीवर दोन अडीच दशकापर्यंत वशिष्ठ परिवाराचाच कब्जा राहीला आहे. या कुटुंबाची सामान्य लोकांपासून वरिष्ठस्तरापर्यंत मजबूत पकड राहीली. १९९२ मध्ये भाजप पं.स. वर पुन्हा सत्तेवर आली आणि राकेश शर्मा (वशिष्ठ) हे पाच वर्षासाठी सभापती बनले होते. बारकुजी दमाहे वरिष्ठ असूनही त्यांना उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान १९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आले. महादेवराव शिवणकर मंत्री बनले. त्यामुळे या क्षेत्रातील सामान्य नेत्याचीही कॉलर टाईट झाली. यात राकेश शर्मा यांचे वजन वाढले. त्यांची मुंबईवारी वाढली. परंतु या दरम्यान शर्मा यांचा सामान्य लोकांशी व मतदारांशी काहीसा संपर्क कमी झाला. त्यामुळे सभापती म्हणून लोकांना ते फारच कमी भेटत होते. याचा दुष्प्रचार खूप झाला आणि १९९६ ला भाजप चारही मुंड्या चित झाली होती. काँग्रेसने संधीचा पुरेपूर लाभ घेत जि.प., पं.स.च्या सर्वच जागा आपल्या खिशात टाकल्या होत्या. हा भाजपसाठी मोठा धडा शिकण्यासारखा परिणाम होता. पण परिणामाने खचून न जाता राकेश शर्मा यांनी पुन्हा पक्षासाठी परिश्रम घेतले. रात्री-बेरात्री लोकांच्या मदतीला धावून जाणे, कोणत्याही कामासाठी कोणत्याही विभागात संपर्क करणे यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला. अधिकारी-कर्मचारी यांच्याशी समन्वय साधण्यात यश येऊ लागले होते. याचा फायदा थेट भाजपला मिळत राहीला. २००० मध्ये नवनिर्मित गोंदिया जिल्ह्यात पहिली निवडणूक झाली. यात सालेकसा पं.स.वर पुन्हा भाजपचा कब्जा झाला. शर्मा यांचा प्रभाव वाढला. त्यांना नंतर जिल्हाध्यक्षपद सुद्धा लाभले.
मागील १५ वर्षात यश-अपयश वाट्याला आले. परंतु शर्मा यांच्या नेतृत्वात भाजप भक्कम स्थितीत राहिली. त्यांंनी किंगमेकरची भूमिका पार पाडली. आज ते हयात नाहीत. पण त्यांची प्रेरणा घेवून काम केल्यास भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. शर्मा यांनी तालुक्यात वाढविलेला पसारा टिकवून ठेवणे यासाठी भाजपला मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तालुक्यात भाजपला एका खंबीर नेतृत्वाची मात्र गरज आहे.