आगीला जबाबदार कोण?
By Admin | Updated: December 25, 2016 02:01 IST2016-12-25T02:01:50+5:302016-12-25T02:01:50+5:30
गोंदिया शहराच्या मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या मार्केट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हॉटेल बिंदल प्लाझात

आगीला जबाबदार कोण?
अजूनही थांगपत्ता नाही
८५ तास लोटले : सात मृतांचे आत्मे मागताहेत न्याय
मनोज ताजने/नरेश रहिले गोंदिया
गोंदिया शहराच्या मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या मार्केट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हॉटेल बिंदल प्लाझात अनेक नियमांची पूर्तता झालेली नसल्याचे नगर परिषदेचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र घटनेला ८५ तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी या गंभीर घटनेसाठी कोण जबाबदार आहेत यांचा थांगपत्ता तपास यंत्रणेला लागला नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
हॉटेल बिंदलमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे वाहनधारकांची अडचण होत होती. यातूनच अनेक वाहने रस्त्यावर लावली जात होती. तरीही कधी त्या वाहनांवर कारवाई झाली नाही. याच हॉटेलच्या पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर असलेला झी महासेल गेल्या अनेक वर्षांपासून तिथे स्थायी दुकान थाटून बसला होता. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
पोलिसांनी नगर परिषदेच्या नगर रचना विभाग व अग्नीशमन विभागाला जबाब देण्याचे पत्र दिले आहे, या पोलिसांच्या पत्रामुळे नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी गोंधळात पडले असून आपल्या चुकीवर पांघरुन घालण्यासाठी कर्मचारी आता पळवाटा शोधत आहेत. पालकमंत्र्यांची दिलेल्या फायर आॅडिट करण्याच्या सूचनेचे पालन होणार का, हाही प्रश्न आहे.
काय झाले फायर आॅडिटच्या पत्राचे?
गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाने हॉटेल बिंदल प्लाझाच्या संचालकाला ३ आॅगस्ट २०१३ रोजी फायर आॅडिट करण्याचे पत्र दिले होते. एक महिन्याच्या आत फायर आॅडिट न केल्यास आपल्याविरुद्ध महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ कलम ५, ६, ७ व ८ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे ठणकावले होते. परंतु या कलमांच्या आधारे काय शिक्षा, काय दंडाची तरतूद आहे या संदर्भात विभाग प्रमुख प्रकाश कापसे यांना विचारणा केल्यावर यासंबंधीच्या कायद्याची माहिती आपल्याकडे नसून आपण आता पुस्तक मागवित असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षानुवर्षे त्याच पत्रांची पुनरावृत्ती करुन पत्र देऊन मोकळे होणे हेच आपले कर्तव्य असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईवरून दिसून येते.
विद्युत विभागामुळे होऊ शकते पुनरावृत्ती
गोंदिया शहराच्या मार्केट परिसरात आधीच अत्यंत अरूंद रस्ते आहेत. त्यात व्यापारी वर्गाने अतिक्रमण केले आहे. त्यातच मार्केट परिसरातील प्रत्येक विद्युत थांबांवर मोठ्या प्रमाणात तारांचे जाळे गुंतलेले आहे. या तारांमधून अनेक वेळा स्पार्र्किंगही होत असते. तरीही त्याबाबत वीज वितरण विभाग गंभीर नाही. अंडरग्राऊंड केबल टाकण्याची योजना वर्षभरापासून मंजूर असूनही निविदेच्या नावावर निव्वळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. ही बाब गांभिर्याने घेतली नाही तर बिंदलमधील आगीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.