‘त्या’ सावकारांवर कारवाई कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 02:00 IST2016-01-31T02:00:25+5:302016-01-31T02:00:25+5:30
कर्जदारांना कच्चा पावत्या देऊन लाखो रुपयांचे सोने सावकारांनी गहाण ठेवून घेतल्याच्या तक्रारी येत आहेत.

‘त्या’ सावकारांवर कारवाई कधी?
उपोषणाचा इशारा : अनेक कर्जदार शेतकरी संकटात
अर्जुनी-मोरगाव : कर्जदारांना कच्चा पावत्या देऊन लाखो रुपयांचे सोने सावकारांनी गहाण ठेवून घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. सावकार कर्जदारांना सोने परत करीत नसल्याने अनेक कर्जदार शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. याविरूध्द वडेगाव-स्टेशन येथील विजय मारोती खुणे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
सावकारांनी सोन्याच्या मोबदल्यात दिलेल्या कर्जाला शासनाने १० एप्रिल रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. यासाठी ३० नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत थकीत असलेले कर्जदार पात्र आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ५९४ कर्जदारांचे ५८ लाख ९० हजार ७३४ रुपयांचे सोने सावकारांकडून कर्जदारांना परत करण्यात आले. ४६७ कर्जदारांच्या ३१ लाख ४६ हजार ७०७ रुपयांच्या दाव्यांना २८ डिसेंबर रोजी मंजूरी देण्यात आली.
यातील कर्जदारांना सोने परत करण्याची सावकारांकडून प्रक्रिया सुरू आहे. मात्र याव्यतिरीक्त २५४ दावे अपात्र ठरविण्यात आले आहेत. तालुकास्तरीय समितीकडून १४ जानेवारी रोजी १६६ दावे पात्र व ६३ दावे अपात्र ठरवून मंजूरीसाठी जिल्हा समितीकडे पाठविण्यात आले. याचे मूल्य १० लक्ष ९२ हजार ७०० रुपये एवढे आहे.
तालुक्यात परवाना प्राप्त सावकारांची संख्या २४ आहे. काही परवानाधारक सावकारांनी साध्या चिढ्ढीवर सोने तारण ठेवून त्या चिढ्या कर्जदारांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या चिट्यांत नमूद सोनेतारणची नोंद त्यांच्या रोकडपुस्तिकेत नाही. अनेकांनी तर तारण करून कर्जदाराला दिलेल्या चिट्टीवर स्वाक्षरी सुध्दा केलेली नाही.
परवानाप्राप्त सावकारांचे पावती बुक व रोकड पुस्तिकेची सहकार विभागाकडून दरवर्षी हिशेब तपासणी केली जाते. शासनाने सावकार कर्जमाफी योजना जाहीर करताच कर्जदार सावकाराकडे दावा दाखल करण्यासाठी जातात. सावकारांनी अशा नोंदी घेतल्या नसल्याने शासनाकडून कर्जमाफी होणार नाही असे सोनेतारण आपल्याच मानगुटीवर बसेल म्हणून कर्जदारांना परत करण्यास चक्क नकार देतात. मुद्दल कर्जाची राशी द्या, व्याज माफी करतो असे सावकार सांगत असल्याचे कर्जदार सांगतात.
अजूनही बरेच कर्जदार या योजनेपासून वंचित आहेत. सावकारांच्या छळाविरूध्द विजय खुणे यांनी २८ जानेवारी रोजी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात कर्जदारांसमवेत तक्रार नोंदविली. यात तालुक्यात विना परवानाधारक सावकार काम करीत आहेत. एकाच परवान्यावर अनेक सावकार व्यवसाय करतात अशा बोगस सावकारांवर व संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई मागणी केली आहे. अन्यथा ९ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)