रायपूर ते दिल्ली सायकलवारी
By Admin | Updated: November 19, 2016 00:48 IST2016-11-19T00:48:02+5:302016-11-19T00:48:02+5:30
युवक- युवतींशी संबंधीत सामाजिक व राष्ट्रीय समस्या यासह स्वच्छता अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ

रायपूर ते दिल्ली सायकलवारी
सशक्तीकरण सायकल यात्रा : नऊ जणांचा यात्रेत समावेश
गोंदिया : युवक- युवतींशी संबंधीत सामाजिक व राष्ट्रीय समस्या यासह स्वच्छता अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ आदि विषयांची जनजागृती करण्याच्या उद्देशातून अजय भारत प्रकल्प अंतर्गत ९ जणांनी रायपूर ते दिल्ली सायकलवारी सुरू केली आहे. ‘सशक्त भारत यात्रा’ नावाने असलेली ही त्यांची सायकलवारी रायपूर (छत्तीसगड) येथून सुरू झाली असून दिल्ली संसदभवन येथे तिचा समारोप करण्यात येणार आहे.
या रॅलीचे गुरूवारी (दि.१७) येथील बालाजी इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी येथे आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. सदर सायकल यात्रेच्या स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी नमाद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो जिल्हासमन्वयक प्रा. बबन मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिय आईसेक्ट शाखेचे प्रबंधक जी.तिरूपतीराव, रैली प्रणेते व प्रमुख डॉ. प्रदीप व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणातून जी. तिरूपतीराव यांनी, आईसेक्ट द्वारा वर्ष २०१५ मध्ये अधिक प्रमाणात अनेक माध्यमांतून युवकांमध्ये जागरूकता अभियान संचालीत करण्यात आले होते. ज्यात प्रामुख्याने कौशल्य विकास यात्रा, विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा, महिला विकास व उद्योग संमेलन अशा विविध प्रकारच्या रोजगार भिमुख गतिविधी आयोजित करण्यात आल्या. यांचाच एक भाग म्हणून आईसेक्ट युवा सशक्तीकरण सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगीतले.
डॉ. अजय यांनी, ही यात्रा १५ नोव्हेंबर रोजी रायपूर येथून सुरू झाली असून १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे यात्रेचा समारोप होणार आहे. युवक- युवतींशी संबंधीत सामाजिक व राष्ट्रीय समस्या विषयक जनजागृती करणे हे या यात्रेचे उद्देश असल्याचे सांगीतले. संचालन श्रध्दा उद्गावकर यांनी केले. आभार पूर्वा पटेल यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुषार चव्हाण, खुमेश पटले, निर्णय गणविर, निधी भगत, सुहासणी बोरला, वनश्री वाघाडे, श्वेता भगत, संदीप डोडाणे, अमोल पुस्तोडे, शुभम बत्रा, दामीनी पारधी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
सौंदड येथेही यात्रेचे स्वागत
सौंदड : नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया व अजय भारत प्रकल्प यांच्या माध्यमातून ९ तरूण सायकल रॅलीतून स्वच्छता अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्कील इंडियाचा संदेश देत आहेत. ही रॅली रायपूर संसदभवातून सुरू झाली असून दिल्ली संसदभवन येथे डिसेंबर महिन्यात तिचा समारोप होणार आहे. रॅलीने सौंदड या गावाला भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)