बावनथडीचे पाणी दिलासा देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 01:51 IST2016-05-12T01:51:02+5:302016-05-12T01:51:02+5:30
प्रशासकीय यंत्रणेने आटापिटा केल्यानंतरही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे अधिकार असलेल्या बावनथडी जलाशयातील...

बावनथडीचे पाणी दिलासा देणार?
बरेच पाणी झिरपले : सोडलेले पूर्ण पाणी धापेवाड्यापर्यंत पोहोचणे कठीण
गोंदिया : प्रशासकीय यंत्रणेने आटापिटा केल्यानंतरही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे अधिकार असलेल्या बावनथडी जलाशयातील केवळ सात एमसीएम पाणी सोडल्यामुळे धापेवाडा प्रकल्पापर्यंत ते पाणी बुधवारी रात्रीपर्यंत पोहोचलेच नाही. बावनथडी ते धापेवाडा या ६५ किलोमीटरच्या प्रवासात वैनगंगेच्या कोरड्या झालेल्या पात्रात बरेच पाणी झिरपल्यामुळे अपेक्षित पाणी धापेवाड्यात पोहोचण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे हे पाणी सर्वांना दिलासा देणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी ज्या बॅरेजमधून पाणी वापरले जाते त्या महत्वपूर्ण अशा तिरोडाजवळील धापेवाडा प्रकल्पातील जलसाठा यावर्षी कधी नव्हे इतका कमी झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला. शिल्लक असलेले तोकडे पाणी कोणाला आणि किती द्यावे असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अखेर बावनथडी प्रकल्पातील मृत पाणीसाठ्यातून पाणी सोडण्यासाठी मध्य प्रदेश सरकारला विनवणी करण्याचा निर्णय झाला. मध्य प्रदेश सरकारच्या परवानगीची गरज असल्यामुळे वरिष्ठ स्तरावर यासाठी मोठी कसरत करावी लागली. कशीबशी ही परवानगी मिळविण्यात यश आल्यानंतर दि.७ ला ७ दलघमी पाणी वैनगंगेत सोडण्यात आले. बुधवारी हे पाणी सोंड्याटोल्यापर्यंतच पोहोचले होते. धापेवाड्यापर्यंत हे पाणी गुरूवारपर्यंत पोहोचण्याची शक्यता असली तरी या पाण्याचा प्रवाह अपेक्षित प्रमाणात नसल्यामुळे किती पाणी धापेवाड्यात साचणार याबाबत शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे हे पाणी कोणाकोणाला द्यायचे असा प्रश्न धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमोर उभा राहणार आहे.
बावनथडी प्रकल्पातून १२.५२१ एमसीएम पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ८.५ एमसीएम पाणी सोडण्याची तयारी बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दर्शविली. त्यातही ७ एमसीएम एवढेच पाणी सोडण्यात आल्यामुळे आणि त्यातील अर्धेअधिक पाणी नदीप्रवाहातच झिरपल्यामुळे पेच निर्माण होणार आहे. बावनथडी प्रकल्पातून पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज आहे. आता उन्हाळी पिकांना जास्त पाणी लागणार नसले तरी पिण्यासाठी आणि विजेची गरज भागविण्यासाठी अदानी प्रकल्पाला पाणी मिळणे तेवढेच महत्वाचे आहे. बावनथडी प्रकल्पातून पुरेसे पाणी मिळाल्यास पिण्यासाठी आणि पिकांसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यातून उरलेले पाणी अदानी प्रकल्पासाठी पुरविले जाऊ शकते. त्यासाठी पुन्हा एकदा राज्य शासनाकडून जोर लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रशासकीय यंत्रणेची धावपळ
बावनथडी प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीत सोडणे सोपे काम नव्हते. संभावित वीज संकटाची कल्पना आल्यानंतर महापारेषण या वीज कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी उर्जा मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना १८ एप्रिलला पत्र देऊन अदानी प्रकल्पाला पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यानंतर उर्जा मंत्रालयाने २५ एप्रिलला यासंदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला ३ मे पासून बावनथडी नदीवरील आंतरराज्यीय राजीव सागर प्रकल्पामधून महाराष्ट्राच्या वाट्यातील ७ दलघमी पाणी जलसंपदा मंत्र्यांच्या मान्यतेने सोडण्याचा आदेश देण्यात आला. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे ४ मे रोजी गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांनी भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी घेतलेल्या बैठकीचा संदर्भ देत शिवनी (मध्यप्रदेश) येथील पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पत्र दिले. अखेर दि.७ ला पाणी सोडण्यात आले.
पैसा लावूनही पाण्यापासून वंचित
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अदानी समुहाकडून १५५ कोटी आगाऊ पाणीपट्टी कर आणि ६५ कोटी बॅरेजच्या कामासाठी असे एकूण २३३ कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळेच टप्पा १ चे काम पूर्ण होऊ शकले. असे असतानाही अदानी प्रकल्पालाच आज या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या बॅरेजची क्षमता २०० एमसीएम आहे, तर अदानी वीज प्रकल्पासाठी वर्षाकाठी ५० एमसीएम पाण्याची गरज भासते. तरीही आता अदानी प्रकल्पाचे पाणी बंद केल्यामुळे वीज निर्मिती ठप्प होऊन भारनियमनाचे संकट ओढवणे जवळजवळ निश्चित झाले आहे.
बावनथडी प्रकल्पातून ७ मे रोजी ७ दलघमी पाणी सोडले आहे. मात्र नदीपात्र कोरडे असल्यामुळे आणि मध्ये काही ठिकाणी बंधारे असल्यामुळे पाणी बरेच झिरपले. त्यामुळे ते बुधवारी सायंकाळपर्यंत धापेवाडा प्रकल्पात पाणी आले नाही. सोंड्याटोल्यानंतर या पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. त्यामुळे धापेवाड्यात किती पाणी येणार याबाबत शंका आहे.
- वाय. आर. यासटवार
कार्यकारी अभियंता, धापेवाडा प्रकल्प