शहरातील काही भागात पाणी टंचाई
By Admin | Updated: May 3, 2016 02:13 IST2016-05-03T02:13:47+5:302016-05-03T02:13:47+5:30
शहरातील सहकार नगर, साई कॉलनी, शहीद मिश्रा वॉर्ड, रेल्वे चौकी अशा विविध भागांत नळाचे पाणी पोहोचतच नाही.

शहरातील काही भागात पाणी टंचाई
तिरोडा : शहरातील सहकार नगर, साई कॉलनी, शहीद मिश्रा वॉर्ड, रेल्वे चौकी अशा विविध भागांत नळाचे पाणी पोहोचतच नाही. तर कित्येक भागांत अगदी अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
आता जेमतेम एप्रिल महिना सरला असून मुख्य मे महिना उरला आहे. मात्र शहरात आतापासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील काही भागातील पाण्याची ही टंचाई आता वाढून अवघ्या शहराला गिळंकृत करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे काही धनाढ्यांसह मध्यमवर्गीयांनी बॉटल व कॅनचे पाणी पिण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अशा पाण्याची मागणी वाढली आहे. कदाचित पाणी विके्रत्यांसोबत यांचे संगणमत नाही ना अशीही शंका निर्माण होत आहे.
पाण्याची एवढी गंभीर समस्या असतानासुद्धा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगर प्रशासन गप्प कसे काय हा विषय सध्या शहरात चर्चेचा ठरला आहे. शहरात पाणी पेटले असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अद्याप कुणीही समोर आले नाही याचे मात्र शहरवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या गंभीर परिस्थितीकडे बघता जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित आदेश देऊन समस्या निकाली काढावी अशी मागणी शहरवासी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या बातमीचा घेतला आधार
४शहरातील पाणी समस्येबाबत आठ दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करून पाणी पुरवठा काळात लोडशेडींगची मागणी केली होती. त्याचा आधार घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना पाणीपुरवठा काळात लोडशेडिंग करण्याबाबत पत्र दिले. तर त्याची प्रतिलिपी आमदार, नगर परिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.