परतून आलेल्या पावसाची धो-धो
By Admin | Updated: September 8, 2014 00:33 IST2014-09-08T00:33:08+5:302014-09-08T00:33:08+5:30
दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे.

परतून आलेल्या पावसाची धो-धो
गोंदिया : दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे. मात्र शनिवारी (दि.६) रात्री पासून बरसत असलेल्या पावसाने रविवारीही (दि.७) हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा पाऊस बरसत होता.
धान पिकासाठी पाण्याची खूप गरज असतानाच जिल्ह्यात शनिवारी (दि.६) पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावले आहेत. काही दिवसांपासून पाऊस न आल्याने पीक हातून जाणार की काय, या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले होते.
मात्र मागील चार-पाच दिवसांपासून वरूणराज पुन्हा बरसू लागले. त्यात मागील २४ तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हलका पाऊस नोंदविण्यात आला आहे. रविवारी (दि.७) सकाळी ८ वाजतापर्यंत गोंदिया तालुक्यात ७.२ मिमी., गोरेगाव येथे ७, तिरोडा येथे ३, अर्जुनी/मोरगाव येथे ३, देवरी येथे ३०, आमगाव येथे ९.४, सालेकसा येथे २१ व सडक/अर्जुनी येथे २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १०५ मिमी. पाऊस नोंद करण्यात आला आहे. त्याची सरासरी १३.२ मिमी आहे. या पावसामुळे ज्या क्षेत्रात सिंचनाची सोय नाही त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानपिकांना लाभ होणार आहे.
विशेष म्हणजे रविवारच्या पावसाने अवघ्या जिल्ह्याला झोडपून काढले आहे. देवरी तालुक्यात पावसाची रिमझीम वगळल्यास अन्य सातही तालुक्यांत चांगला पाऊस बरसल्याची माहिती आहे. रात्रीपर्यंत पावसाची ही रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे शेतकरी सुखावला असतानाच जिल्ह्यातील धरणांतही पाण्याच्या साठ्यात वाढ होण्यात मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)