मजुरी करता-करता ‘तो’ झाला मालक
By Admin | Updated: January 11, 2015 22:53 IST2015-01-11T22:53:21+5:302015-01-11T22:53:21+5:30
अनेक जण नशिबाला दोष देत आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्यात दिवस काढतात. पण आपले नशिब आपल्या हाताने घडवून पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणारे युवकही दुनियेत कमी नाहीत.

मजुरी करता-करता ‘तो’ झाला मालक
युवा दिन विशेष : कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलून परिस्थितीवर मात
एच.के.फुंडे - कालीमाटी
अनेक जण नशिबाला दोष देत आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्यात दिवस काढतात. पण आपले नशिब आपल्या हाताने घडवून पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणारे युवकही दुनियेत कमी नाहीत. आमगाव तालुक्यातील किकरीपार या छोट्या गावातील संजय सीताराम दोनोडे (२८) हा युवकही अशाच युवकांपैकी एक आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून कामाला लागलेला संजय गुरे चारता-चारता आणि मजुरी करून कुटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून आज एका दुकानाचा आणि वृत्तपत्र एजन्सीचा मालक झाला आहे.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने संजयला अवघे सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. स्वत:ला जास्त शिकता आले नाही तरी संजयने लहान भाऊ अजय आणि बहिणीच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. सुरुवातीला गावात गुरे चारण्याचे काम केल्यानंतर तो नागपूर येथे मजुरीसाठी गेला. तिथल्या मिळकतीतून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असला तरी त्यात त्याचे समाधान नव्हते. काहीतरी दुसरे करून मजूर म्हणून न जगता मालक म्हणून जगण्याची उमेद त्याच्यात कायम होती.
आमगाव येथे तो आपल्या वयाच्या १७ व्या वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होता. मजुरकामातून जमविलेल्या थोड्याथोडक्या पैशाचा सदुपयोग करीत २००८ मध्ये संजयने वृत्तपत्रांची एजन्सी घेतली. त्यावेळी त्याला मासिक उत्पन्न अवघे १८०० रुपये मिळायचे. पण संजयने ग्राहकांशी व्यवहारिक संबंध न ठेवता कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध जपून आपल्या व्यवसायाला अधिक वाढविले.
पहाटे पाच वाजतापासून आमगावच्या गल्लोगल्लीत विविध वर्तमानपत्रे पोहोचविणाऱ्या संजयने २०१० मध्ये तालुक्यातील काही एजंसी विकत घेतल्या. यातून तो महिन्याकाठी ३५ हजार रुपये कमवितो. याच व्यवसायाच्या माध्यमातून आमगाव येथे जनरल स्टोअर्स टाकले. पहाटेपासून पेपरविक्रीच्या व्यवसायाकडे लक्ष देणारा संजय दिवसा आपले दुकान सांभाळतो.
परिस्थितीशी जुळवून घेत कुढत बसण्याऐवजी काहीतरी करण्याची जिद्द ठेवली तर ती नक्कीच पूर्ण होते हेच संजयच्या या प्रवासातून दिसून येते. बेरोजगारीने बरबटलेल्या समाजासाठी संजयचा हा स्वयंरोजगार निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. परिस्थितीशी दोन हात करून यशाचे शिखर गाठणारा संजय हा वास्तवीक जीवनातला हीरो ठरला आहे.